आंबेनळी बस दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण, पोलिसांच्या तपासावर मृतांच्या नातेवाईकांचे प्रश्नचिन्ह

| Updated on: Jul 28, 2019 | 11:36 AM

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटातील दुदैवी घटनेला आज (28 जुलै) एक वर्ष पूर्ण झाली. मात्र या घटनेला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. कारण रायगड पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणाचा तपास थांबवण्याची परवानगी मागितली आहे.

आंबेनळी बस दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण, पोलिसांच्या तपासावर मृतांच्या नातेवाईकांचे प्रश्नचिन्ह
Follow us on

रायगड : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटातील दुदैवी घटनेला आज (28 जुलै) एक वर्ष पूर्ण झाली. मात्र या घटनेला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. कारण रायगड पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणाचा तपास थांबवण्याची परवानगी मागितली आहे. विद्यापीठाच्या सहलीच्या गाडीला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला होता. ही बस खोल दरीत कोसळून या बसमधील 30 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अपघातातून वाचलेले एकमेव प्रकाश सावंतदेसाई यांच्यावर मृत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता, असं असताना पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे.

आंबेनळी अपघात झाल्यानंतर या अपघातातून वाचलेले प्रकाश सावंतदेसाई हेच गाडी चालवत होते असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. यामुळे प्रकाश सावंतदेसाईंवर संशयाची सुई फिरू लागली. पण या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले असताना पोलिसांनी या प्रकणाचा तपास थांबवण्यासाठी रायगड न्यायालयात विनंती अर्ज सादर केला आहे.

रायगड पोलिसांचे या संदर्भातील पत्र न्यायालयाने स्वीकारले आहे. पोलिसांनी कोकण कृषी विद्यापीठाचे बस चालक प्रशांत भांबेड यांनी बेदरकारपणे गाडी चालवल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. त्यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे दुर्घटनाग्रस्त नातेवाईक नाराज झाले आहेत.

अपघातातून वाचलेले प्रकाश सावंत देसाई यांची रत्नागिरीला बदली केली गेली. 30 जणांच्या मृत्यूमुळे प्रकाश सावंतदेसाई यांच्यावर संशयाची सुई कायम आहे. अपघातातून वाचलेल्या सावंतदेसाई यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी मृतांचे नातेवाईक अद्याप करत आहेत. तसेच पोलीस तपास थांबवला जावू नये म्हणून मृत नातेवाईकांनी न्यायायलात मागणी केली आहे.

आंबेनळीतल्या या अपघाताला एक वर्ष पूर्ण होत असताना, अशाप्रकारे तपास थांबवण्याचे पत्र देवून रायगड पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.  या दुर्देवी घटनेला एका वर्षपू्र्ण झाल्यानंतर  प्रसारमाध्यमांना माहिती दिली जाईल असं सागत बोलणं टाळलंय. वारंवार प्रकाश सावंतदेसाई हे कसे बचावले असाच सवाल उपस्थित केला जातोय. अपघातात एवढीच पारदर्शकता असेल तर पोलिस नार्को टेस्टच्या माध्यमातून दुध का दुध, पानी का पाणी का करून पहात नाहीत असाच सवाल उपस्थित केला जात आहे.