Kangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्च

| Updated on: Oct 28, 2020 | 10:19 AM

आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारात दिली आहे.

Kangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्च
Follow us on

मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut Case) विरुद्धच्या खटल्यासाठी महापालिकेने (BMC) आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या एच पश्चिम विभागीय कार्यालयाने कंगना रनौतच्या वांद्रे पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. याप्रकरणी कंगना रनौतने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती (Kangana Ranaut Case).

याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारात दिली आहे.

अभिनेत्री कंगना रानौतने वांद्रे पाली हिल येथील आपल्या घरात माणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय सुरु केले होते. या कार्यालयात कंगनाने बेकायदेशीर बांधकाम केले होते. याच दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्याचे मुंबईत याचे पडसाद उमटले होते. मुंबई महापालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी 354 कलमान्वये नोटीस दिली होती. या नोटीसीला योग्य उत्तर दिले नसल्याने पालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले होते (Kangana Ranaut Case).

कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले जात असताना कंगणाच्या वकिलाने आपण उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे निदर्शनास आणल्यावर तोडकाम थांबण्यात आले होते. कंगणाच्या बेकायदेशीर काम तोडण्यास उच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने कोणत्या वकिलाची नियुक्ती केली आणि त्यांना किती रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी मागितली होती. याबाबत माहिती देताना या प्रकरणी पालिकेची उच्च न्यायालयात मांडण्यासाठी अस्पि चिनॉय यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना पालिकेने 22 सप्टेंबर रोजी 3 वेळा 7 लाख 50 हजार तर 7 ऑक्टोबर 8 वेळा 7 लाख 50 हजार रुपये असे एकूण 82 लाख 50 हजार रुपये फी म्हणून अदा केले आहेत अशी माहिती पालिकेच्या कायदा विभागाने दिली आहे.

दरम्यान, एकीकडे मुंबई महापालिका कोरोनाच्या काळात महसूल बंद झाल्याने आर्थिक संकटात असल्याचे सांगत आहे. त्याच वेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेची उधळपट्टी असल्याची टिका भाजपा नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली आहे.

Kangana Ranaut Case

संबंधित बातम्या :

जातीच्या नव्हे, तर गरिबीच्या आधारावर आरक्षण द्या; कंगनाची मागणी

…तर काही दिवसातच हिमाचल कचऱ्याचे आगार बनेल; कंगनाचं पर्यटकांना कचरा न फेकण्याचं आवाहन

Kangana Ranaut : मुंबई पोलिसांचं ठरलं, कंगनाला चौकशीला बोलावणार

Kangana Ranaut | पोलिसांच्या समन्सनंतर कंगना रनौतची ‘टीवटीव’, पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका!