मेळघाटात भीषण अपघात, पिकअप 50 फूट दरीत कोसळलं, अनेकांचा मृत्यू
Amravati : मेळघाटातील राणी गाव घाटात मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन पलटी होऊन 50 फूट दरीत कोसळले आहे. या भीषण अपघातात पाच मजूर जागीच ठार झाले आहेत.

अमरावतीतून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. मेळघाटातील राणी गाव घाटात मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन पलटी होऊन 50 फूट दरीत कोसळले आहे. या भीषण अपघातात पाच मजूर जागीच ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींपैकी अनेकांचा प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील मजूर पिकअप वाहनातून बेलतलाईवरून कंजूली या आपल्या गावी जात होते. या पिकअपमध्ये 20 पेक्षा जास्त मजूर होते. मजुरांना घेऊन जाणारे हे पिकअप वाहन राणी गाव घाटात आले त्यावेळी ते पलटी झाले आणि 50 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनेकजण गंभीर जखमी
या अपघातात पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. पिकअप दरीत कोसळल्याने 5 जणांना जागीच जीव गमवावा लागला आहे. या अपघात स्थळावरील काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. यात अनेक मृतदेहांचा चेंदामेंदा झाला असल्याचे दिसत आहे. तसेच काही मजूर गंभीर जखमी झालेले दिसत आहेत. या अपघातानंतर परिसरावर शोककळा पसरली आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
दरम्यान, राणी गाव घाटात झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. पोलीस आणि स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी मजूरांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या अपघातामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलसांना वाहतूक सुरळित करण्यासाठी मेहनत करावी लागली. दरम्यान या अपघातात 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
