द्वेष, फूट आणि भांडणं, पुढच्या काही दिवसांत…, आदित्य ठाकरे भाजपबाबत काय म्हणाले?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात असलेल्या द्वेषाशिवाय, भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

शनिवारी विजयी मेळावा झाला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोघांची उपस्थिती होती. त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी या मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
‘भाजप दरोरोज त्यांचा महाराष्ट्राप्रतीचा द्वेष ह्या ना त्या मार्गाने ओकत आहे! काल भाजपने मराठी माणसाची/महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केली — ज्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, तोसुद्धा भाजप सरकारच्या अपयशामुळे! आणि आजवर त्यांना पकडण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. आज भाजपचा तो खासदार, ज्याच्या ऐय्याश पार्टीसाठी पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी काश्मीरची सुरक्षा वापरली गेली असं आपण सर्वांनी ऐकलं, त्याने महाराष्ट्राबद्दल अश्लाघ्य आणि घृणास्पद वक्तव्य केले आहे.
प्रश्न असा आहे की भाजप ह्या थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की महाराष्ट्रद्वेष हाच भाजपचा खरा डीएनए आहे? हे ऐकून मला जितका राग आणि घृणा वाटली आहे, तितकंच आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की हे सर्व भाजपचं जुनंच “फोडा आणि राज्य करा” धोरण आहे — खास करून बिहार आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी!.
महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात असलेल्या द्वेषाशिवाय, भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही — त्यांचा फॅार्म्युला ठरलेला असतो – द्वेष, फूट आणि भांडणं! पुढच्या काही दिवसांत, भाजप त्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या ‘प्लेबूक’ जाळ्यात अडकू. हे भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी. पण सावध राहा — हीच भाजपची नीती आहे. आणि जर भाजपने ह्या दोघांविरोधात कारवाई केली नाही, तर हे स्पष्ट होईल की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे!’ असा ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
