Ajit Pawar Plane Crash : अपघात की कट? सीआयडीचा सर्वात मोठा खुलासा, तपासात काय काय आढळले?
अजित पवार विमान अपघाताचा तपास सीआयडीकडून अत्यंत सखोलपणे सुरू आहे. घातपाताचा संशय आणि रोहित पवार यांनी केलेले आरोप या पार्श्वभूमीवर सीआयडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत भीषण विमान अपघात झाला आहे. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. आता या प्रकरणाला एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या या दुर्घटनेबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) आपली पहिली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. हा केवळ अपघात होता की त्यामागे एखादा सुनियोजित कट (घातपात) होता, या दोन्ही शक्यतांची अत्यंत सखोल चौकशी सुरू आहे, असे सीआयडीने म्हटले आहे. या निवेदनामुळे अजित पवारांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. आता या तपासात नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी काल एक विशेष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कसा सुरु आहे, आतापर्यंत या तपासात काय काय समोर आले, या तपासाची सद्यस्थिती काय, याबद्दलची माहिती दिली. आम्ही या प्रकरणातील तांत्रिक आणि मानवी अशा दोन्ही बाजू तपासत आहोत. जर तपासादरम्यान यामध्ये कोणताही गुन्हेगारी कट, खून किंवा जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा आढळून आला, तर सीआयडी तात्काळ औपचारिक एफआयआर (FIR) दाखल करु. तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सुनील रामानंद म्हणाले.
सीआयडीला तपासात आतापर्यंत काय काय आढळले?
सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताचा तांत्रिक तपास करणाऱ्या ‘एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ (AAIB) चा सविस्तर अहवाल अद्याप मिळालेला नाही. हा अहवाल तपासासाठी फारच महत्त्वाचा असणार आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला आहे. सध्या त्यातील डेटाचे सखोल विश्लेषण सुरू आहे. अजित पवारांच्या विमानाने किती वाजता उड्डाण घेतले, त्यांच्या उड्डाणावेळी वैमानिकाचे संभाषण आणि विमानाची तांत्रिक स्थिती काय होती, हे यातून स्पष्ट होईल, असे सीआयडीने म्हटले आहे.
या तपासात अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणा सहभागी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील डेटा एकत्र केला जात आहे. त्यामुळे त्याचे विश्लेषण करण्यास वेळ लागत आहे, असे सीआयडीने स्पष्ट केले.
रोहित पवारांचा संताप
तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून राज्य सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले आहे. अपघाताला २५ दिवस उलटूनही अद्याप गुन्हेगारी दृष्टिकोनातून तपास का पूर्ण झाला नाही? पोलीस एफआयआर दाखल करण्यास इतका विलंब का लावत आहेत? उड्डाणापूर्वी हवामान अनुकूल असल्याचा दावा एका अॅरो अधिकाऱ्याने केला होता, मग तरीही अपघात कसा झाला? असे अनेक सवाल रोहित पवार यांनी केले आहेत.
यासोबतच रोहित पवारांनी ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर किंवा चर्चेत हवामानाबाबत अनुकूल माहिती दिली गेली होती, त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान याप्रकरणी कोणताही राजकीय दबाव न बाळगता या दुर्घटनेचा तपास अत्यंत निष्पक्षपणे केला जात आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांवरून कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्व तांत्रिक पुराव्यांची साखळी जोडल्यानंतर याचे सत्य समोर येईल, असेही सीआयडीने स्पष्ट केले आहे.
