Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : पेपर जळाले नाहीत, विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळाला ? रोहित पवार यांचा रोखठोक सवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. अपघातानंतर विमान जळाले असतानाही आजूबाजूची कागदपत्रे कशी वाचली आणि ब्लॅक बॉक्स कसा डॅमेज झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे सांगणे म्हणजे माहिती दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत, रोहित पवारांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचा बारामतीजवळ विमान अपघात झाला. 28 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांच्यासह आणखी चौघेही मृत्यूमुखी पडले. त्यांच जाणं अख्ख्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक होतं. पवार कुटुंबावर तर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला. 29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेला आता जवळपास 3 आठवडे उलटून गेले असून हा अपघात नव्हे तर घातपात आहे, असा संशय, अशी शंका अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून ते या मुद्यावर सातत्याने भाष्य करत असून गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबई, दिल्लीत पत्रकार परिषद घेून अपघाताच्या आदल्या दिवशीचा संपूर्ण घटना क्रम मांडला. तसेच काही पुरावेही दिले. याप्रकरणी लवकरात लवकर तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
आज मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही पुढले मुद्देही मांडले. विमानातील इंधन, ब्लॅक बॉक्स याबद्दलही सातत्याने प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. ब्लॅक बॉक्स, व्हॉईस रेकॉर्डरचं थोडं नुकसान झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. याच मुद्यावरून आता रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
ब्लॅक बॉक्स कसा जळाला ?
अजित पवार यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि मोठा स्फोट होऊन आग लागली. त्यातील 5 जणांचेही मृतदेह बरेच होरपळले होते. मात्र विमान जिथे कोसळलं, त्याच्या आजूबाजूला काही कागदपत्रं पडली होती. ते कागद जराही जळाले नव्हते. याच मुद्याचा आधार घेत रोहित पवारांनी रोखठोक प्रश्न विचारले आहेत.
विमानातील ब्लॅकबॉक्स जळाला, असं सांगण्यात येत आहे. खरं सांगायचं झालं तर 1100 डिग्री सेल्सिअस असताना, तिथे 1 तास ब्लॅक बॉक्स पडला असेल तरच तो थोडा डॅमेज होतो, असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. जर सहा हजार मीटर खोली पर्यंत पाण्याचं प्रेशर असेल तर अशा परिस्थितीतसुद्धा विमानातला ब्लॅक बॉक्स टिकू शकतो. विमान पडलं तिथे बरेच कागद होते, पण ते कमी जळले. स्फोटाचा धक्का काही सेकंदाचा असतो. त्यामुळे कागद जळत नाही, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
आणि विमानाची बॉडी पाहिली तर त्याच्या आतमध्ये सुरक्षित ठिकाणी ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे तो ब्लॅक बॉक्स जळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळला हा जो प्रचार सुरू होता, जे सांगण्यात येतंय ते केवळ मॅन्यूप्युलेट करण्यासाठी आहे असा आरोप रोहित पवारांनी केला. जर तिथले पेपर जळाले नाही, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? असा रोखठोक सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. आत्तापर्यंत इतर देशातही असेच अपघात झाले, तिथेही अशीच सेम आग लागली. त्या आगीची तीव्रताही तितकी सेम होती. अगदी सेम घटना होती. तरीही तिथे ( त्या विमानाच्या अपघातस्थळी) ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, असं सूचक विधान रोहित पवार यांनी केलं.
