तेव्हा मी मुंडे साहेबांचे 10 मिनीटं पाय धरले, अन् आज…, विलास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनवणे आक्रमक, मागचं सगळंच सांगितलं…
दोन गटात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. विलास घुले यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला, या घटनेत या तरुणाचा मृत्यू झाला आहे. केजमध्ये ही घटना घडली आहे. विलास घुले असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून, तो हॉटेल व्यावसायिक होता. विलास घुले यांच्या हत्येमुळे जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान या प्रकरणात बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर देखील आरोप करण्यात आला आहे. मुलावर आरोप झाल्यानंतर आता खासदार बजरंग सोनवणे चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाले बजरंग सोनवणे?
पहिला एफआयआर झाला त्यामध्ये माझ्या मुलाचं नाव नाही. जेव्हा विलास घुले यांचा मृत्यू झाला, त्यानंतर काय माहीत कट कसा आणि कुठून कुठे शिजला, कोणाला फोन आले. सुरुवातील तर खासदार म्हणजे माझ्यावरच गु्न्हा दाखल करा अशी मागणी होत होती. सोशल मिडिया आणि इतर काही ठिकाणी आंदोलन देखील झालं, बर हे आंदोलन कोणी केलं, पब्लिक आहे, घर आहे हे मला मान्य आहे. पण हे सर्व घडवून आणणारी टाळकी कोण? ते कोण कोणत्या गुन्ह्यात होते, ते कुठून आले? हे सगळे विषय वेगवेगळे आहेत, मला त्यात पडायचं नाही. सोमवारपर्यंत या प्रकरणात माझं किंवा माझ्या मुलाचं नाव या प्रकरणात कुठेही नव्हतं. पण त्यानंतर माझं नाव का आलं हे मला माहिती नाही. पाहू आता पुढे काय काय होतं ते, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी पोलिसांना विनंती करतो की या प्रकरणाचा निपक्षपातीपणाने तापस करा, आणि या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी.
दरम्यान या प्रकरणात राजकारण होतंय का? असा प्रश्नही यावेळी बजरंग सोनवणे यांना विचारण्यात आला, यावर बोलताना ते चांगलेच आक्रमक झाले, त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. माझ्यावर कोण सूड उगवणारे आहेत ओ, तेच भोगत आहेत. यांचं सर्व मला माहिती आहे. कोणं चेतावणीपर भाषण करतंय, कोण लोकांना पेटवतंय हे सर्व मला माहिती आहे. तू आमचं कशाला काढतो, तूझं तू बघ. 25 वर्ष या पठ्ठ्याने तुला मदत केली. तुम्हाला पण मुलं आहेत, मला पण मुलं आहेत. माझ्या मुलांपर्यंत गेलातना आता दाखवतो. तुम्ही पाप कराल आणि त्याचं बिल जर आमच्यावर फाडण्याचा प्रयत्न केला तर ते सोपं जाणार नाही, तुम्हाला इथून पुढच्या काळात बजरंग सोनवणे काय आहे ते दिसेल. अरे तुला तिकीट द्यावं म्हणून 2009 मध्ये मी दहा मिनिटं गोपीनाथ मुंडे साहेबांचे पाय धरले होते, याला दोन साक्षीदार सुद्धा आहेत, असा हल्लाबोल या पत्रकार परिषदेमध्ये बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
