औरंगाबादः औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे .मालमत्ताकर व पाणीपट्टी वसुली वाढीसाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मालमत्ताचे GIS मॅपिंग सर्वेक्षण करण्यात येत आहे. याची सुरवात आज पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel), आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) , आमदार अतुल सावे, रमेश बोरणारे, महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्ह्याधिकारी सुनील चव्हाण, उप आयुक्त श्रीमती अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता यांत्रिकी डी के पंडित,स्मार्ट सिटीचे अधिकारी,कर्मचारी यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद महानगर पालिका व स्मार्ट सिटी यांच्या माध्यमातून Amenex या कंपनी द्वारे (GIS) द्वारे मालमत्ता सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे. यासाठी 150 ते 200 स्वयंसेवकांची तीन महिन्याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षनाचे फॉर्म वाटप करणार आहेत. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी मालमत्ता धारकाकडून माहिती भरून घेतील व क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईल अॅपवर माहिती अपडेट करतील.
यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने 172 किलोमीटर क्षेत्रफळाचे ड्रोन सर्व्हे करण्यात आले आहे. यात महानगरपालिकेला 1,92,000 इमारती आढळून आल्या आहेत. आज मनपाच्या अभिलेखात 2.70 लाख मालमत्तांची नोंद आहे. या सर्व्हेक्षणाद्वारे साडे चार ते पाच लाख मिळकतीची नोंद होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.
सर्व प्रथम झोन 3 व 4 मध्ये याची सुरुवात होणार आहे. या स्वयंसेवकांना गणवेश आणि ओळखपत्र दिले गेले आहे, अशी माहिती उप आयुक्त श्रीमती अपर्णा थेटे यांनी दिली. यावेळी मा प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांनी मनपा तर्फे सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षण साठी नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
इतर बातम्या-