तुळजाभवानीच्या दरबारातून सांगतो, मराठ्यांवर अन्याय सुरू आहे… मनोज जरांगे पाटील यांचा दावा
मनोज जरांगे पाटील यांनी तुळजाभवानी मंदिरातून मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेवरून त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. काही प्रमाणपत्रांच्या रद्दबातल प्रकरणात सरकारने सांकेतिक भाषेत आदेश दिल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचा दौरा सुरू केला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील निर्णयाक आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वी समाजातील लोकांशी बोलून त्यांना भूमिका पटवून देण्यासाठी आणि आंदोलनाची रणनीती सांगण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. आज धारावीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तुळजाभवानीच्या दरबारात सांगतो, मराठ्यांवर अन्याय सुरू आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हे धाराशिवला तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील यांनी तुळजाभवानी मंदिरात कुणबी प्रमाणपत्रांशी संबंधित कागदपत्रे दाखवत मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप केला. मराठा समाजावर अन्याय करू नका म्हणत जरांगे पाटलांनी तुळजाभवानीला साकडे घातले.
मग प्रकार कशामुळे झाला?
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे म्हणतात आमची काही चूक नाही, गैरसमज झाला. मग हा प्रकार नेमका कशामुळे? असा सवाल जरांगे पाटलांनी केला. वर्षा बोडके यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द होते. मात्र त्यांच्या भावाचे प्रमाणपत्र वैध ठरते. हे असं कसं होऊ शकतं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुळजाभवानीच्या दरबारातून सांगतो, मराठ्यांवर अन्याय सुरू आहे, असंही ते म्हणाले.
बावनकुळेंची सांकेतिक भाषा
ज्योती दहीहंडे यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश आहे. मात्र पडताळणी समितीने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिल्याचा दावा त्यांनी केला. प्रमाणपत्रावर लिहिलेल्या ‘पैसे द्या’ या शब्दांचा अर्थ काय? असा गंभीर सवालही त्यांनी केला. बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना सांकेतिक भाषेत लिहून पाच दिवसांत प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
धनगरांसोबतही असेच वागले
धनगर समाजासह अनेक समाजांच्या बाबतीत सरकार असंच वागलं, असा आरोपही त्यांनी केला. तुळजाभवानीच्या साक्षीने जरांगे पाटलांनी पुरावे दाखवले. कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारला थेट सवालही केले. त्यानंतर तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यावर मनोज जरंगे पाटील यांनी आदिवासी बांधवांशी संवादही साधला.
