देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्षांची बैठक प्रथमच औरंगाबादेत होणार, काय आहे बैठकीचा अजेंडा?

| Updated on: Sep 13, 2021 | 5:51 PM

सामान्य नागरिक, शेतकरी आणि उद्योग जगासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता येईल, याविषयावर बँकांचे अधिकारी व वित्त मंत्रालयातील अधिकारी या बैठकीत चर्चा करतील.

देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्षांची बैठक प्रथमच औरंगाबादेत होणार,  काय आहे बैठकीचा अजेंडा?
16 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीची माहिती देताना केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड
Follow us on

औरंगाबाद: केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Union Minister of State for Economy) यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादमध्ये प्रथमच देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्याअध्यक्षांची बैठक (meeting of all Nationalized bank chairman and officials) आयोजित करण्यात आली आहे. एरवी दिल्ली, मुंबई अशा शहरात होणारी ही बैठक प्रथमच औरंगाबादमध्ये होत आहे. 16 सप्टेंबर रोजी ही बैठक शहरातील पंचतारांकित हॉटेल ताज(Hotel Taj)  येथे होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी दिली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पद आल्यानंतर डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादमध्ये  विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच प्रयत्नात राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची समजली जाणारी ही बैठक औरंगाबादेत घेतली जात आहे. त्यामुळे औरंगाबाद तसेच मराठवाड्याच्या दृष्टीने बैठकीत कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.  तसेच राष्ट्रीयकृत बँकांची बैठक असल्याने अवघ्या देशातील सामान्य नागरिकांच्या दृष्टीनेही या बैठकीला महत्त्व आहे.

बैठकीचा अजेंडा काय?

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे सुरु केलेली जनधन योजना, उद्योगांसाठी 10 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यासाठीची मुद्रा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, डिजिटल ट्रान्सफर आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला जाईल. तसेच या योजनांना आणखी चालना कशी मिळेल व शेतकरी तसेच सामान्यांसाठी त्याचा जास्तीत जास्त किती लाभ मिळेल, याविषयी चर्चा केली जाईल.

बैठकीला कोणत्या अधिकाऱ्यांची उपस्थिती?

या बैठकीत देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे अध्यक्ष, एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर, फायनान्स सेक्रेटरी, अॅडिशनल सेक्रेटरीसह नाबार्डचे अध्यक्षदेखील उपस्थित असतील. तसेच एसबीआय बँकेचे अध्यक्ष, इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष यासह नव्या औद्योगिक नगरी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर प्रोजेक्टचे राष्ट्रीय संचालक अभिषएक चौधरी हेदेखील प्रामुख्याने हजेरी लावतील.

डीएमआयसीला मिळणार अर्थ मंत्रालयाचे बळ

कराड यांनी सांगितले की, शेंद्रा येथील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर अर्थात डीएमआयसी प्रकल्पात मोठ्या कंपन्यांचे उद्योग यावेत. कंपन्यांनी इथे प्रकल्प उभे करावेत, याकरिता सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जाईल. तसेच रोजगार निर्मिती करणाऱ्या अशा प्रकल्पांसाठी बँकांनी तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना या बैठकीत दिल्या जातील .

नाबार्ड व शेतकऱ्यांच्या मुद्द्यांचाही समावेश

या बैठकीला नाबार्डचे अध्यक्षही उपस्थित असतील. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि कर्ज सुविधांबद्दलही चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नाबार्डचे अध्यक्ष जी आर चिंतला हेदेखील उपस्थित राहतील. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र चे सीईओ ए.एस. राजीव यांनाही बैठकीत आमंत्रित करण्यात आले आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad Jobs: ग्रीव्हज कॉटन कंपनी औरंगाबादेत उभारणार इंजिन निर्मितीचे हब, शहरात रोजगार वाढीची संधी

Aurangabad Gold: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने अजून स्वस्तच, चांदीच्या दरातही घसरण, पहा आजचे भाव