आधी अभिनंदन, नंतर दिला डोस; कर्जमाफी झाली आता या मुद्द्यावर बच्चू कडू आंदोलनाच्या तयारीत
Bachchu Kadu On Loan Waiver : मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाणार आहे. यावर बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे.

बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाणार आहे. धान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने याबाबतचा शासन निर्णय सध्या जारी होणार नाही, मात्र आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतचा अध्यादेश सरकारकडून काढला जाणार आहे. या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. आता कर्जमाफीला मंजूरी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना म्हटले की, कर्जमाफीची जी घोषणा झाली आहे, निर्णय झाला आहे त्याचं स्वागत करतो आणि सरकारचे आभार मानतो. मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. आंदोलनात सहभागी असलेले राजू शेट्टी, असेल वामनराव चटप, डॉक्टर अजित नवले असतील महादेवराव जानकर असेल रविकांत तुपकर असेल यांचे आभार मानतो. कर्जमाफीची लढाई जिंकली मात्र आता प्रोत्साहन पर एक लाख रुपये करावे यासाठी माझी लढाई सुरू असेल.
शेतकरी कर्जमाफीवरून रघुनाथदादा पाटलांची टीका
शेतकरी कर्जमाफी मंजुरीच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील यांनी टीका केली आहे. केवळ मतांसाठी मंजुरी घेतली आहे, 50 हजार अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा सरकारकडून अनेक वर्ष सांगितले जातय, पण ते अजून दिलं गेलं नाही. सरकारकडे शेतकरी कर्जमुक्तीची मागणी करतोय, पण कर्जमाफीचा निर्णय घेतला जातोय, सरकारला कर्जमाफी आणि कर्जमुक्ती यातला फरक कळत नाही. सरकारला द्यायचं नाही म्हणून आचारसंहितेची सबब सांगितले जात आहे, केवळ मतांसाठी खोडसाळपणा चालू असून सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप देखील रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे.
56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार
सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात, त्यांना प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाणार आहे. ऐन मान्सूनच्या तोंडावर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
