आधी सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?
Maharashtra Politics : दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. काल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहांची भेट घेतली आहे.

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाडीसाठी अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. काल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या इतर खासदारांसोबत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही अमित शहांची भेट घेतली आहे. त्यामुळे दिल्लीत नेमकं काय घडतंय अशी चर्चा सुरू झाली आहे. या नेत्यांनी अमित शाह यांची भेट का घेतली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अमित शहांच्या भेटीला
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी महानगर पालिकेतील जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शहा यांनी राज्यात जिथे शक्य असेल तिथे युती करा अशा सूचना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यांनी युती करण्यास अमित शहा यांना हरकत नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार गटाच्या खासदारांनी घेतली होती अमित शहांची भेट
याआधी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इतर सहकारी खासदारांसह अमित शहा यांची भेट घेतली होती. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना सुळे यांनी म्हटले होते की, ‘केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात शासन व्हावे ही मागणी मांडली. बीड जिल्ह्यातील स्व महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपासात कसलीही प्रगती होताना दिसत नाही.
केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले.
यामध्ये मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात शासन व्हावे ही मागणी मांडली. बीड जिल्ह्यातील स्व महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपासात कसलीही… pic.twitter.com/vsOcNPZvf4
— Supriya Sule (@supriya_sule) December 16, 2025
स्व. मुंडे यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर गजाआड करुन त्यांना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका मांडली. फलटण येथे झालेल्या स्व. डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषी व्यक्तींना शासन व्हावे व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली. यासोबतच महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांची दूरवस्थेबाबत माहिती देऊन राष्ट्रीय आपत्तीनिवारण कोषातून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत करावी अशी मागणी केली.
याखेरीज नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत हिंसाचार झाला तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रकमा आढळून आल्या. सुदृढ लोकशाहीसाठी हे चित्र योग्य नसून याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी अशी भूमिका मांडली. या भेटीसाठी आवर्जून वेळ दिल्याबद्दल अमितभाई शाह यांचे मनापासून आभार.
