मनसेत आणखी एक मोठा भूकंप, संतोष धुरीनंतर आणखी एका अत्यंत जवळच्या सहकाऱ्याने सोडली राज ठाकरेंची साथ

Raj Thackeray : मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एका अत्यंत जवळच्या सहकाऱ्याने राज ठाकरेंची साथ सोडली आहे. या नेत्याने विविध पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मनसेत आणखी एक मोठा भूकंप, संतोष धुरीनंतर आणखी एका अत्यंत जवळच्या सहकाऱ्याने सोडली राज ठाकरेंची साथ
RajaBhau Chaughule
Image Credit source: Google
| Updated on: Jan 06, 2026 | 5:05 PM

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा केली होती. बऱ्याच काळानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. मात्र आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीमध्ये नुकसान होत असल्याने संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एका अत्यंत जवळच्या सहकाऱ्याने राज ठाकरेंची साथ सोडली आहे. या नेत्याने विविध पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राजाभाऊ चौगुले यांनी सोडली राज ठाकरेंची साथ

संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि सरचिटणीस राजाभाऊ चौगुले यांनी राज ठाकरेंची साथ सोडत एकनाश शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजाभाऊ चौगुले यांच्यासह मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ऍड.देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर, संतोष यादव यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे मनसेला ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला असून शिवसेनेची ताकद वाढली आहे.

कोण आहेत राजाभाऊ चौगुले?

राजाभाऊ चौगुले हे हाडाचे शिवसैनिक आहेत. विद्यार्थी सेनेपासून राजाभाऊ चौगुले हे राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राजाभाऊ चौगुले यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी मनसेत बरीच वर्ष काम केलं. मनसेतून पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या तिकीटावरून नगरसेवक म्हणून निवडूनही आले होते. त्यानंतर ते महापालिकेत विधी समितीचे अध्यक्षही झाले होते.

राजाभाऊ चौगुले हे चेंबूर- टिळकनगर परिसरातले. पण त्यांनी घाटकोपरमधून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर राजाभाऊ चौगुले यांनी परत मनसेत प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे. यामुळे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.