मुख्यमंत्री होताच ‘या’ गोष्टी करणार, देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मुलाखतीतून सांगितला 5 वर्षांचा प्लान
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांची विशेष मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी आपला पुढच्या पाच वर्षांचा नेमका प्लॅन काय आहे ते सांगितलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर डीडी वाहिनीला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या 5 वर्षांचा नेमका संकल्प काय आहे? याबाबत भाष्य केलं. “महाराष्ट्र आता थांबणार नाही याचा अर्थ असा की, अडीच वर्षापूर्वी आमचं सरकार आलं. शिंदे मुख्यमंत्री झाले. मी, अजितदादा उपमुख्यमंत्री झालो. आम्ही महाराष्ट्राला ट्रॅकवर आणलं. अनेक योजना सुरू केल्या. आता या योजना आणि प्रोजेक्ट वेगाने पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र आता थांबणार नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “नदीजोड प्रकल्पावर माझा भर असणार आहे. इरिगेशन मंत्री म्हणून मी चार नदीजोड प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कायम दुष्काळातून मुक्त होणार आहे. ग्रीन एनर्जीवर भर असणार आहे. २०३० पर्यंत महाराष्ट्रातील वीज ग्रीन एनर्जी असेल. शेती आणि उद्योगाला त्याचा अधिक फायदा होणार आहे. ते झालं तर रोजगाराची निर्मिती होईल. अर्थकारणाला चालना मिळेल. दोन गोष्टीवर विशेष भर देणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशावरही प्रतिक्रिया दिली. “जे यश या निवडणुकीत जनतेने दिलं आहे. ते यश सेलिब्रेशन करण्यासाठी नाही. प्रेरणा घेऊन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिलं आहे. मला जबाबदारीची जाणीव आहे. भाजपच्या एक-एक कार्यकर्त्याला कालचा कार्यक्रम पाहून मनातून आनंद झाला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘३७५ किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क करणार’
“मी २०१६मध्ये एक घोषणा केली होती. मुंबईच्या एमएमआर रिजनमधील कोणत्याही भागात एक तासात जाता आलं पाहिजे. आम्ही त्याच्यापुढे जात आहोत. कोस्टल रोड झाला. वर्सोवा-मढचं टेंडर दिलं. त्याचं काम सुरू होत आहे. मढपासून विरारपर्यंत सिलिंक तयार केलं आहे. जपान सरकारने ४० हजार कोटी देण्याचं कबूल केलं आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक कमी होणार आहे. ३७५ किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क करणार आहोत. पाच वर्षात हे काम सुरू केलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.




“हे सर्व काम जेव्हा होईल तेव्हा मुंबईकरांचं एक महत्त्वाचं काम आहे. ते पूर्ण होईल. मुंबईकरांचे तीन तास वाचतील. कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे. बस सिस्टिमचा मेकओव्हर करणार आहोत. त्यासोबत मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये रहिवास ही मोठी समस्या आहे. ही समस्या आपण सोडवत आहे. आपण काम सुरू केलं आहे. मराठी माणसाला मुंबईतच घर मिळायला पाहिजे हे काम आपण सुरू केलं आहे”, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं.