
मुंबई महानगर पालिकेच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. आज वरळीत महायुतीची प्रचार सभा पार पडली. यावेळी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. काही लोक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत असा आरोप करताना मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा उल्लेख अबोध बालके असा केला. तसेच इतरही अनेक मुद्द्यांवरून ठाकरेंवर निशाणा साधला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडला आहे, आज तिथीने आई जिजाऊंची जयंती आहे. आई जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवछत्रपतींना तयार केलं होतं. आज क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले यांचीही जयंती आहे. या खास दिवशी प्रचाराला सुरुवात करत आहोत.
14 -15 तारीख ही संक्रमणाची तारीख आहे, या दिवशी आपल्याला चमत्कार घडवायचा आहे. ही निवडणूक मुंबईच चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलण्याची आहे. आता दाणा पाणी वाल्यांनी त्यांचा ठिकाणा कुठे आहे ते दाखवायचं आहे. मी मुंबईमध्ये उतरत होतो तेव्हा मुंबई कुठे गेली का? कुठे सरकली का हे पाहत होतो. मात्र मुंबई कुठे गेलेली नव्हती. मुंबई सरकत नाही, निवडणूक आली की काही लोकांना वाटतं मुंबई उत्तरेकडे सरकते. मुंबई नव्हे तुमची बुद्धी सरकत आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही. बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्या सोबत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आपल्याकडे आहे. मुंबईकर जागा झाला आहे. ठाकरे एकत्र आलेत, आता तुमचं काय होणार, तुम्ही कसं लढणार? असं मला विचारण्यात आलं. देखकर धुंदलीसी ताकद हौसला हमारा कम नही होता; झुटी आँधियोंसे वही डरे जिन चिरागों में दम नही होता.
आपल्या भाषणात पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मला तर आता लक्षात आलं आहे, मुंबईमध्ये श्रेय चोरणारी टोळी आहे. यात काही अबोध बालके देखील आहेत. ते म्हणतात मुंबईचा विकास आम्ही केला. मात्र मेट्रोचं काम, कोस्टल रोड, बीडीडी चाळ ही कामे आम्ही केली आहेत. मात्र विकासात खोडा घालण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.