मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला विकासाचा रोडमॅप, दीड तासांच्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप देखील मांडला.

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या विकासाचा रोडमॅप मांडला सोबतच विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षाचा सूर पाहिल्यावर वाटलं ते भ्रमीतही आहे आणि संभ्रमितही आहे. लोकांना काही मुद्द्यावर संभ्रमीत करायचे म्हणून मुद्दे मांडले जात आहेत. ट्रिलियन डाॅलर इकोनाॅमीबद्दल बोललं जातं आहे. पण आमच्या मनात त्याबद्दल शंका नाही. भास्कर जाधव यांनी अनेक गोष्टी मांडल्या. शिवरायांचा, टिपू सुलतानचा विषय मांडला. टिपू सुलतान चांगले की वाईट यासंदर्भात मुद्दाच नाही. आमचा आक्षेप टिपू सुलतानाची महाराजांसोबत तुलना करण्यात आली त्याला आहे, असा हल्लाबोल यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, जीडीपीच्या तुलनेत किती कर्ज असावे? यात देशात सर्वात उत्तम पॅरॅमिटर्स आपले आहेत. जीडीपीतील वाटा कमी झाला वगैरे असं बोलले गेले, मात्र ते रिलेटिव्ह असतं. २०२१-२२ मध्ये देशातील जीडीपीत आपली टक्केवारी १३.१ टक्के, २०२२-२३ १३.५ टक्के, २०२३-२४ मध्ये १३.८ टक्के तर २०२४-२५ मध्ये १४ टक्के इतकी आहे. जीडीपीमध्ये आपला वाटा वाढत आहे. जीडीपीच्या कर्जाच्या सगळ्या पॅरॅमिटर्स महाराष्ट्राने पूर्ण केल्या आहेत, अर्थव्यवस्था समजणाऱ्या नेत्याला आकडेवारी समजून सांगणे योग्य नाही. असं म्हणत त्यांनी यावेळी जयंत पाटील यांना टोला देखील लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, जीडीपीत आपली हिस्सेदारी वाढत आहे. आता दहा औद्योगिक राज्य असली तरीही आपला वाटा वाढतोय. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवा हे आपण करतोय. विरोधकांची कॅसेट गुजरातवरच अडकली आहे. 2022 पासून तेच ते उद्योग बाहेर गेलेत असं विरोधक सांगत आहेत. त्यांनी अभ्यास करून विषय मांडले तर बरं होईल. विरोधक गोबेल्सचं तत्व अवलंबत आहेत. हे सरकार 2029 पर्यंत आहे, पुढच्या टर्मला पण आमचंच सरकार येईल, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान २०३४, २०४७ चे विकसित महाराष्ट्राचे डॉक्युमेंट पाहा, प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार केला आहे. २५ टक्के निधी त्यासाठी डीपीडीसीला द्यावा लागेल. प्रत्यक्ष तो कार्यान्वित करत आहोत. २०४७पर्यंत ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची आहे. दरवर्षी १० लाख रोजगार निर्मिती करायची आहे. प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, वित्तीय शिस्त व शाश्वत विकास या माध्यमातून वित्तीय तूट अडीच टक्क्याखाली आणायची आहे, पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत शोधायचे आहेत. एक व्हिजन मॅनेजमेंट युनिट आपण तयार केले आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
