भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा केंद्राचा डाव; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

| Updated on: Feb 06, 2021 | 7:31 PM

भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करून द्यायचा कट पंतप्रधानांनी रचला आहे, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा केंद्राचा डाव; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
Follow us on

वाशिम : आज देशात परिस्थिती फार वाईट आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. कामगारांचे कायदे मोडून काढले जात आहेत. भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करून द्यायचा कट पंतप्रधानांनी रचला आहे, असा आरोप जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. (Central government’s ploy to give capitalists access to agribusiness : NCP)

पाटील यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहिलं राज्यकर्ते असे क्रुर कसे काय असू शकतात? असा प्रश्न मनात येतो. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आज दहावा दिवस आहे. यानिमित्ताने जयंत पाटील आज वाशिम जिल्हयात आहेत. यावेळी पाटील यांनी वाशिम जिल्हयातील रिसोड विधानसभेचा आढावा घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या मतदारसंघात निवडणूक लढवते, ज्या मतदारसंघात लढवत नाही अशा दोन्ही मतदारसंघांना राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त भेट देत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे करायचे आहे. सत्ता असो किंवा नसो आपल्या कार्यकर्त्यांचा जत्था नेहमीच तयार असायला हवा.

शेतकरी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल – डिझेलचे भाव वाढवले. चहूबाजूंनी जनतेला अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. परकीय लोक देशावर सत्ता गाजवत आहेत असा भास होतो आहे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कुर्ला येथे देशव्यापी चक्का जाम आंदोलन

शाहाची तानाशाही नही चलेगी… नही चलेगी.., आवाज दो हम एक है…, जय जवान जय किसान…, भारत माता की जय…, किसानों के अधिकारमे राष्ट्रवादी मैदान मे… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज कुर्ला परिसर दणाणून सोडला. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज कुर्ला येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते आणि या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला होता. आजच्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सहभागी झाले होतेच शिवाय मुंबईभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नवाब मलिक यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. भाजप शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष असल्याचे सांगतानाच मोठ्या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात घुसवण्याचा डाव असल्याचा थेट आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला. सरकारला मॉडर्न कायदा आणण्याचा अधिकार असताना भाजप सरकारने डायरेक्ट कायदाच बनवला आहे. या तीन कृषी कायद्यांविरोधात गेले चार महिने शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणताता भाजप सरकारला शरम वाटली पाहिजे, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला. लाल किल्ल्यावर जो प्रकार घडला त्याला शेतकरी नाही तर भाजप जबाबदार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा

भाजपनं उंटावरुन शेळ्या राखणं बंद करावं, प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका

‘तुम कुस्ती करो, हम कपडे संभालते हैं!’ असलं काही करु नका, अजितदादांचा मोलाचा सल्ला

इंदापुरात अजितदादा म्हणाले, तर समोरच्याचं डिपॉजिट जप्त झालं असतं !

(Central government’s ploy to give capitalists access to agribusiness : NCP)