नवे रुळ, ताशी 15 किमीचा वेग, तरीही लोकल कशी घसरली? डोंबिवली अपघाताप्रकरणी मोठी अपडेट समोर
डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे चाक रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेच्या चौकशीसाठी रेल्वे प्रशासनाने ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली असून तांत्रिक कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. काल डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे डब्बे रुळावरुन घसल्याने मोठा अपघात झाला. यानंतर मुंबईची लोकल विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तिथे अवघ्या १५ किमी प्रतितास वेगाची मर्यादा असतानाही हा बिघाड झाल्याने रेल्वेच्या तांत्रिक कामावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने आता ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे.
नेमकी घटना काय?
काल सकाळी ऐन गर्दीच्या वेळी डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे चाक रुळावरून घसरले. यामुळे कल्याण ते कोपर दरम्यानची धीम्या मार्गावरील वाहतूक तब्बल २ तास ४५ मिनिटे पूर्णपणे ठप्प होती. कामावर जाण्यासाठी निघालेल्या हजारो प्रवाशांना भर उन्हात रेल्वे रुळांवरून चालत जावे लागले. या गोंधळामुळे दिवसभरात ९ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर १२ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी अलीकडेच १० तासांचा मोठा मेगाब्लॉक घेऊन रुळांचे आणि स्लीपर्स बदलण्याचे काम करण्यात आले होते. नवीन स्लीपर्स टाकल्यानंतर आणि क्रॉसओव्हर पॉईंटचे काम सुरू असताना तिथे ताशी १५ किमीची वेगमर्यादा लावण्यात आली होती. जर वेग इतका कमी होता, तर तांत्रिकदृष्ट्या चाक घसरणे शक्य आहे का? नवीन टाकलेल्या स्लीपर्स किंवा रुळांच्या फिटिंगमध्ये काही दोष होता का? हा मानवी हलगर्जीपणा आहे की साहित्याचा निकृष्ट दर्जा? असे अने सवाल उपस्थित होत आहेत.
मध्य रेल्वेने नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती कोणत्या बाबींची तपासणी करणार आहे.
१. अपघाताच्या वेळी लोकलचा नेमका वेग किती होता? २. क्रॉसओव्हर पॉईंटवरील रुळांची स्थिती आणि तांत्रिक जोडणी योग्य होती का? ३. मेगाब्लॉक दरम्यान झालेल्या कामाचे ऑडिट करण्यात येईल. ४. ही मानवी चूक (Human Error) आहे की तांत्रिक बिघाड?
प्रवाशांचा वाढता संताप
दरम्यान मध्य रेल्वेवर गेल्या काही महिन्यांत अपघातांचे सत्र वाढले आहे. १५ सप्टेंबर रोजी बदलापूर-अंबरनाथ दरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातानंतर आता महिनाभरातच डोंबिवलीत ही घटना घडली. वारंवार होणाऱ्या या बिघाडांमुळे आणि लोकलच्या विलंबामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासन या चौकशीनंतर कोणावर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
