राज्याच्या राजकारणात खळबळ, बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला; नेमके कारण काय?
भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनमी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीचे नेमके कारण काय आहे? असे विचारेल जात आहे.

Raj Thackeray : मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव आहे. मराठी भाषा, मराठी माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या सभेला हजारो लोकांची गर्दी असते. दरम्यान, ते आमदार, मंत्री नाहीत किंवा खासदारही नाहीत. परंतु त्यांच्या शीवतीर्थ या मुंबईतील बंगल्यावर नेहमीच रेलचेल असते. अनेक बडे नेते, मंत्री त्यांच्या भेटीला पोहोचतात. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
भेटीचं नेमकं कारण काय?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली होती. राज्याच्या राजकारणात हा एक अभूतपूर्व असा प्रयोग होता. पालिकेच्या निवडणुकीदरम्यान,राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा लावून धरत सत्ताधाऱ्यांवरही टीका केली होती. असे असले तरी आता भाजपाचे नेते असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी आहे, त्या भेटीत कोणत्या राजकीय विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु या अनोख्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
बवनकुळेंनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं?
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर बावनकुळे यांनी या भेटीचे कारण सांगितले आहे. ही एक सदिच्छा भेट होती. यात राजकीय चर्चा झाली नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे. “मी राज ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्यापासून, मंत्री झाल्यापासून आमच्यात दोन ते चार वेळा चर्चा झाली. मला तुमच्याकडे चहा घ्यायला यायचे आहे, असे मी त्यांना सांगितलेलं होतं. आज राज ठाकरे यांनी चर्चेसाठी चहा घेण्यासाठी मला वेळ दिला,” असे बावनकुळे यांनी सांगितले.
तसेच, आमची ही केवळ सदिच्छा भेट होती. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. फक्त मैत्रीतून, मित्र म्हणूनच आमची ही भेट होती. आमची ही भटे खूप चांगली होती. त्यांनी माझा अत्यंत चांगला सन्मान केला. माझी आणि राज ठाकरे यांची मैत्री अबाधित आहे. याच मैत्रीमुळे मी त्यांची भेट घेतली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
