ऐन गणेशोत्सवात भीषण अपघाताचा थरार, गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला; दोघांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन गणेशोत्सवात भीषण अपघाताचा थरार घडला. गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने दोघांचा मृत्यू झाला.

ज्ञानेश्वर लोंढे : राज्यभरात गणेशोत्सवाचा आनंद साजरा केला जात असताना छत्रपती संभाजीनगरध्ये अपघाताची घटना घडली आहे. गणपतीच्या मिरवणुकीत कंटेनर घुसून भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दोन गणेश भक्तांचा मृत्यू झाला. चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावरील पिंप्रिराजा गावाजवळ ही भीषण अपघातातची घटना घडली. मिरवणुकीत कंटेनर घुसल्याने दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात सात वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जण जखमी झाले. या गणपती मिरवणुकीत घडलेल्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनासाठी गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक रस्त्यावरून जात असताना अचानक कंटेनर त्यात घुसला. या धडकेत विठ्ठल रामभाऊ जाधव (49) आणि रमेश लहूजी बनसोडे (45) या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर सात वर्षांच्या चिमुकल्यासह 12 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर काही जखमींवर पुढील उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत चिमुकल्यासह दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गणपती आनंदाच्या वातावरणात जमलेल्या भाविकांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळलाय. मृत विठ्ठल जाधव दिवसभर शेतात काम करून घरी परतत होते.
दोन शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू
गावात गणपती मिरवणूक सुरू असल्याने ते रस्त्याच्या कडेला थांबून मिरवणूक पाहत होते. त्याचवेळी भरधाव कंटेनर त्यांच्या अंगावर आला आणि या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. विठ्ठल जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, २२ वर्षांची मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. दुसरे मृतक रमेश बनसोडे हेही शेतकरी होते. काम आटोपून घरी परतताना ते गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी थांबले होते. कंटेनर मिरवणुकीत घुसल्याने त्यांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींपैकी काहींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले. जखमींमध्ये रमेश बनसोडे, मेहबूब पठाण, प्रकाश पाटरे आणि किशोर घुले यांचा समावेश आहे. दरम्यान, कंटेनरने मिरवणुकीत घुसल्यानंतर काही अंतरापर्यंत धडक देत पुढे गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून गणपती आनंदावर दुःखाचे सावट आले आहे.
