Khavdya Dongar : ‘तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी मंगळसूत्र काढून फेकते, पण..’ खवड्या डोंगरावर मृत्यूआधी जो संवाद घडला त्याची माहिती समोर
Khavdya Dongar : अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली होती. मात्र तो काही डोंगरावरून खाली उतरण्यास तयार नव्हता. डोंगराच्या कड्यावर कुणाला रोखण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला. दोघे डोंगरावरुन खाली कोसळले.

महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एक मन सून्न करणारी घटना घडली. आयफोनच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. आई, वडिल आणि मुलगा. एकाक्षणात संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं. सगळ्या देशभरात या घटनेची चर्चा आहे. आयफोनचे हप्ते थकले होते. त्यावरुन कुटुंबात वाद झाला होता. वडील खर्चाला पैसे देत नाहीत आणि मोबाइलचे हप्ते थकल्याची सल कुणाल चांदगुडेच्या मनात होती. त्यावरुन घरात त्याचा वाद झालेला. कुणाल रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. त्याच्या पाठोपाठ त्याचे आई-वडील देखील डोंगरावर पोहोचले, परंतु कुणाला हा कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. कुणाल डोंगरावर पोहोचल्यानंतर आई-वडिलांनी तिथे तब्बल तीन तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो डोंगरावरच्या अत्यंत उंच असलेल्या भागावर उभा होता.
अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली होती. मात्र तो काही डोंगरावरून खाली उतरण्यास तयार नव्हता. डोंगराच्या कड्यावर कुणाला रोखण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला. दोघे डोंगरावरुन खाली कोसळले. आई तिथेच उभी होती. तिने हे सर्व पाहिलं. आईला हा धक्का सहन झाला नाही. तिने देखील उडी मारली. क्षणात कुटुंब संपलं.
तुझ्यासोबत येते, दोघे राहू
ही घटना घडली, त्याआधी तिथे काय घडलं? याची माहिती समोर आली आहे. “तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, दोघे राहू, पण मला सोडून जाऊ नकोस” आत्महत्या करणाऱ्या मुलाकडे व्याकुळ आई अशी आर्त हाक देत त्याला कठड्यावरून अलीकडे येण्यासाठी विनवत होती. वडिलांसोबतच्या मतभेदातून स्वप्नच अपूर्ण राहत असल्याचा गैरसमज करुन घेतलेल्या कुणालने टोकाचं पाऊल उचललं.
माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही
शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेने मुलांची बदलणारी मानसिकता आणि संपत चाललेल्या सहनशीलतेचा गंभीर मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला. मूळ अंबड तालुक्यातील धनगर पिंपळवाडी येथील असलेले चांदगुडे कुटुंब 18 वर्षांपासून शहरात वास्तव्यास होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुणालने नुकताच अकरावीत प्रवेश घेतला होता. दहावीच्या परीक्षेत त्याने 92 टक्के गुण मिळवले होते. काही दिवसांपासून वडिलांसोबत त्याचे वाद होत होते. वडील खर्चाला पैसे देत नसल्याची आणि मोबाइलचे हप्ते थकल्याची सल त्याच्या मनात होती. कुणालने त्याच्याकडील आयफोन, हातातील घड्याळ, गळ्यातील चांदीची साखळी काढून फेकली होती. ‘आई, माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं”, असं कुणाल म्हणत होता. शेवटी अखंखी कुटुंब घेऊन त्याने आपलं जीवन संपवलं.
