AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश, किती ठिकाणी विजय? फडणवीसांनी सांगितला आकडा

नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुका तसेच महापालिका निवडणुकीतही राज्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं, त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकातही भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे, या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश, किती ठिकाणी विजय? फडणवीसांनी सांगितला आकडा
devendra fadnavis Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 09, 2026 | 7:53 PM
Share

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता जवळपास हाती आले आहेत. महापालिका निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. भाजपला या निवडणुकीत मोठं यश मिळालं असून, या निकालावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 2017 मध्ये देखील आम्ही अतिशय चांगली मुसंडी ग्रामीण भगामध्ये मारली होती. 2014 असेल 2019 असेल किंवा 2024 असेल, आम्ही ग्रामीण भागात विधानसभा निवडणुकांमध्ये अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता. पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे हे जे मिथक होतं, की भाजप हा शहरी किंवा नमशहरी पक्ष आहे, ते आम्ही 2014 मध्ये तोडलं होतं. ते 2017 मध्ये आम्ही अधोरेखित केलं, आणि आता मात्र आम्ही ते पूर्णपणे स्थापित केलं आहे, की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण भागत नंबर एकचा पक्ष आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हा जनतेचा विश्वास आहे, एकूणच या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे ग्राम विकासाचं कार्य हाती घेतलं. ज्या पद्धतीने ग्रामीण भागातील सोई सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी विविध विकास योजनांमधून सकारात्मक वातावरण तयार केलं, आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सरकारने जे कार्य करून दाखवलं, त्यामुळे एक मोठा विश्वास जनतेच्या मनात तयार झाला. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजप असेल किंवा आमचे मित्र पक्ष असतील त्यांना प्रचंड समर्थन मिळत आहे, आणि त्याचाच हा परिणाम आहे की, आम्ही एवढी मोठी भरारी घेतली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

भाजप हा या निवडणुकीत नंबर एकचा पक्ष ठरला आहे, जवळपास सात ठिकाणी भाजप नंबर एकवर आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा या ठिकाणी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला दोन ठिकाणी यश मिळालं आहे. रत्नागिरी आणि रायगडमध्ये शिवसेनेला यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर एकवर आहे. आणि दोन ठिकाणी आम्ही तिनही पक्ष एकत्र लढलो होतो, कोल्हापूर आणि लातूरमध्ये तिथेही आम्हीच नंबर एकवर आहोत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.