TET पेपर फुटप्रकरणात सरकार अँक्शन मोडवर, एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
टीईटीचा पेपर उद्या रविवारी, २८ जून २०२६ रोजी होणार असतानाच आधल्या दिवशी फुटल्याने लाखो उमेदवारांच्या तयारीवर पाणी फेरले आहे. या प्रकरणात आता राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील भावी शिक्षकांसाठीची टीईटी परीक्षा अवघ्या २४ तासांवर असताना तिचा पेपर फुटल्याने उद्या रविवारी ( २८ जून २०२६ ) होणारी ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर राज्यातील पाच लाखाहून अधिक उमेदवारांची मेहनतीवर पाणी फेरले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. ठाण्याचे जॉईंट सीपी पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेत ही SIT स्थापन करण्यात येणार आहे. TET पेपर फुटीच्या प्रकरणी सरकार आता अँक्शन मोडवर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांना फोन करून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात अत्यंत कठोर कारवाई करा आणि कुणाचीही गय करू नका असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांचा दादा भुसे यांनाही फोन
या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना ही फोन केला आहे.त्यांच्याकडून या प्रकरणातील घडामोडी जाणून घेतल्यानंतर त्यांना सूचना केल्या आहेत. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा करुन या प्रकरणातील सूत्रधारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणार असे म्हटले आहे.
टीईटी परीक्षा नकोच !
उद्या रविवारी होणारा टीईटीचा पेपर फुटल्याने तो रद्द करण्यात आला आहे. मात्र, आता ही टीईटीची परीक्षा नकोच असल्याची मागणी शिक्षक महासंघ मुंबई आणि कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. दैनंदिन अध्यापनाचा आणि टीईटी परीक्षेचा दुरान्वेही संबंध नसल्याने ही टीईटी परीक्षाच रद्द करण्याची मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे.
आधीच दैनंदिन अध्यापनाबरोबरच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्याने या शैक्षणिक कामांमुळे शिक्षक त्रस्त झाले असून शिक्षकांना कोणी वालीच राहिला नाही. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात टीईटी तसेच बीएलओच्या कामांबाबत राज्यातील सर्व विधानसभेचे आमदार आणि विधान परिषद सदस्यांकडे शिक्षक महासंघाच्या माध्यमातून निवेदन देणार असल्याचेही अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे.
