मुख्यमंत्र्यांचा Gen Z सोबत संवाद, फडणवीसांनी सांगितला श्रीनगरच्या लाल चौकात पहिल्यांदा तिरंगा फडकवण्याचा तो किस्सा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात जेन झी सोबत संवाद साधला, यावेळी बोलताना श्रीनगरच्या लाल चौकात पहिल्यांदा झेंडा कसा फडकवला गेला, याचा एक किस्सा त्यांनी सांगितला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात जेन झी सोबत संवाद साधला, दरम्यान या मुलाखतीमध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. इथे आलेल्या काही तरुणांची अशी इच्छा आहे, की पुढे चालून त्यांनी मुख्यमंत्री बनावं, पंतप्रधान व्हावं. परंतु क्षेत्र कोणतंही असो, उद्योग असो, खेळ असो, किंवा राजकारण असो तुम्ही जेव्हा यशस्वी होतात, तेव्हा तुमच्यावर खूप दबाव असतो. मात्र तुमच्यापेक्षा जास्त दबाव इतर कोणावर असू शकत नाही, कारण सध्या तुम्ही अनेक जबाबदाऱ्या घेऊन चालला आहात. तुम्ही या दबावाला कसं हॅन्डल करतात? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या आयुष्यातील काही अनुभव सांगितले आहेत.
या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मी ज्या पद्धतीने राजकारणात आलो, ते पहाता राजकारण हा काही माझ्यासाठी व्यवसाय नाहीये. राजकारण हे माझं मिशन आहे, आणि मला असा ठाम विश्वास आहे की, राजकारण हे सामाजिक आर्थिक बदलांचं सर्वात मोठं साधन आहे. त्यामुळे माझी जी सुरुवात झाली, मी तेव्हा 18 वर्षांचा होतो. तेव्हा विद्यार्थी परिषदेनं असं ठरवलं, त्या काळात श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा नव्हता. तेव्हा विद्यार्थी परिषदेच्या आम्ही दहा हजार लोकांनी असं ठरवलं की, लाल चौकामध्ये तिरंगा फडकवायचा. तिथे जायचं आणि लाल चौकात तिरंगा फडकवायचा.
तेव्हा मी 18 वर्षांचा होतो, तेव्हा माझ्यासोबत तीस लोक होते. त्यामध्ये कोणी सोळा वर्षांचं होतं, कोणी सतरा वर्षांचं मी त्यांच्यामध्ये सर्वात मोठा होतो, माझं वय 18 वर्षांचं होतं. आम्ही सगळेजण जम्मूमध्ये पोहोचलो, उधमपूरमध्ये पोहोचलो. उधमपूरमध्ये जेव्हा आम्हाला अडवलं, तेव्हा आम्ही पायी-पायी श्रीनगरच्या दिशेनं निघालो. त्यानंतर आम्हाला मिलेट्रिने थांबवलं, अटक केलं. पुन्हा आम्हाला जम्मूला आणलं, त्यानंतर आम्ही दिल्लीला आलो.
दिल्लीला आल्यानंतर आम्ही पंतप्रधानांच्या निवासाला घेराव घातला. आम्ही पंतप्रधानांना तो झेंडा दिला आणि सांगितलं तुम्ही श्रीनगरच्या लाल चौकात झेंडा फडकवा. ही गोष्ट वेगळी की त्यावेळी त्यांनी देखील तिथे झेंडा लावला नाही, परंतु तुम्हाला लक्षात असेल 1992 साली मुरलीमनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा वापस जाऊन आम्ही पहिल्यांदा लाल चौकात भारताचा तिरंगा फडकवला असा किस्सा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे.
