Devendra Fadanvis : भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर, मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
आज मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजप महायुतीचे रितू तावडे महापौरपदी आणि संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान झाले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्यांना शुभेच्छा देत पारदर्शी व लोकाभिमुख प्रशासनाचे आश्वासन दिले. अनुभवी रितू तावडे आणि संजय घाडी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा विकास साधत, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अपेक्षित प्रशासन देण्याचा महायुतीचा संकल्प आहे.

अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौरमदी अखेर भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्या. तर शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौर म्हणून कार्यभार स्वीकारला. आज त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हातून पदभार स्वीकारला. महापालिकेच्या सभागृहात घोषणा दणाणत असताना महापौर-उपमहापौर नियुक्तीचा हाँ सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. या सोहळ्यानतंर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत रितू तावडे यांचे अभिनंदन केलं. हापौर, उपमहापौर आणि सगळे पदाधिकारी मिळून या महापालिकेला एक दिशा देतील. सामान्य मुंबईकरांची स्वप्न ते पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक अनुभवी, अस्सल मराठी चेहरा
मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना- भारतीय जनता पक्ष महायुतीचे आमचे सदस्य महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी हे महायुतीचे दोन्ही शिलेदार आहेत. या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याबद्दल मी आणि एकनाथ शिंदे यांनी लोकांकडे जी मतं मागितली होती. मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता, त्याला अनुरूप अशा प्रकारचं पदारोहण आज होतंय. मी विशेषत: महापौर रितू तावडे यांचं अभिनंदन करतो. एक अनुभवी, अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नांकरता आक्रमक भूमिका नेहमी घेतली आहे. मुंबईच्या विकासाचा कार्यक्रम महायुती सरकारने सुरू केला आहे, तो यापुढेही महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जाईल, असा मला विश्वास आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
उपमहापौर म्हणून जुने, जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याही अनुभवाचा फायदा निश्चित मिळेल. आमचा हा प्रयत्न असेल की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने , त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू. आमचे महापौर, उपमहापौर आणि सगळे पदाधिकारी मिळून या महापालिकेला एक दिशा देतील. सामान्य मुंबईकरांची स्वप्न ते पूर्ण करतील. त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल. मी व एकनाथ शिंदे, पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी उभं राहू. आपण जी नवी मुंबई घडवत आहोत, त्यांच्या माध्यमातून गती देण्याचं काम करू असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.
