Maharashtra Budget 2026: जावळीच्या जंगलातील वासोटा किल्ल्याबाबत बजेटमध्ये मोठी घोषणा
Maharashtra's Budget 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात पर्यटन आणि मनोरंजनसृष्टीशी संबंधित कोणकोणत्या तरतुदींचा समावेश आहे, त्याबद्दल जाणून घ्या..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील पर्यटनासाठी आणि मनोरंजनसृष्टीसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 2047 पर्यंत वार्षिक 16 कोटींहून 38 कोटींपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. त्याकरिता मुंबई, सिंगापूर आणि दुबईमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणं, खाजगी गुंतवणूक आकर्षित करून जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आणि पर्यटन परिपथ विकसित करणे, तसंच प्रवास 100 टक्के डिजिटाइज करून पर्यटन परिसंस्था निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त निवडक 50 पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे.
मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे
“सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला वासोटा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं आणि रणनितीचं प्रतीक आहे. पर्यटकांच्या सुरक्षित, सुलभ आणि पर्यावरणपूरक प्रवेशाकरिता मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प करण्याचे नियोजित करण्यात आले आहे,” अशी घोषणा त्यांनी यावेळ केली. सध्या वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी बामणोली इथून बोटीतून प्रवास करावा लागतो. कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून बोटिंग करत जावं लागतं. बोटिंगनंतर किल्ल्याच्या दिशेने पायी प्रवास करावा लागतो. हा प्रवास जवळपास अडीच ते तीन तासांचा आहे.
नैसर्गिक दुर्गमता लाभलेला असा हा वासोटा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखं दुर्गरत्न आहे. वासोटा किल्ला ज्या डोंगरावर आहे तिथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने आपल्या गुरूच्या नावावर वसिष्ठ असं ठेवलं असेल अशी आख्यायिका आहे. कालांतराने याचं नाव वासोटा असं पडलं असावं असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ल्याचं नाव व्याघ्रगड असं ठेवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत या गडाचा वापर कैदी ठेवण्यासाठी केला जात असे.
नागपुरात तिसरी फिल्मसिटी
नाशिक येथे रामकाल पथ विकास प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणारी कामे प्रगतीपथावर आहे. राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगा तालुका, रामटेक जिल्हा नागपूर येथे विकसित करण्यात येणार आहे. रामटेक इथं रामसृष्टी आणि कालिदाससृष्टी उभारण्यात येईल. तसंच महाकवी कालिदास यांचं जीवनचरित्र सर्वसामान्य जनतेला आणि नवीन पिढीला कळावं यासाठी चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते सहकार्य केलं जाईल.
