Nari Shakti Vandan Adhiniyam : …तर 273 महिला संसदेत गेल्या असत्या, फडणवीसांनी सांगितली आरक्षणाची खरी ताकद
महिला आरक्षणाला विरोध करून विरोधकांनी नारीशक्तीचा अपमान केला असून त्यांची मानसिकता महिलाविरोधी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

लोकशाहीमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे ही काळाची गरज असताना, विरोधकांनी मात्र या प्रक्रियेची हत्या केली आहे,” अशा खरमरीत शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांची मानसिकता पुरुषी आणि प्रतिगामी आहे. आता आगामी काळात १ कोटी महिलांच्या सह्यांची मोहीम राबवून जनजागृती करु, असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच महिला आरक्षणाचे मारेकरी कोण हे जनतेला दाखवून देऊ, असेही फडणवीसांनी सांगितले.
नारी शक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) संसदेत नामंजूर झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. जगातील सर्व प्रगत लोकशाही राष्ट्रांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक ठरत आहे. मात्र, भारतात जेव्हा महिलांना कायदेशीर अधिकार देण्याची वेळ येते, तेव्हा विरोधक आडकाठी निर्माण करतात. विधानसभा आणि लोकसभांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे ३३ टक्के आरक्षण लागू होऊ नये, यासाठी विरोधकांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ही त्यांची जुनीच प्रवृत्ती असून त्यांना महिलांना सत्तेत वाटा द्यायचाच नाही, हे आता स्पष्ट झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संसदेतील महिला प्रतिनिधीत्व वाढलं असतं
आज आपल्या संसदेत केवळ ७३ महिला आहेत. जर हे आरक्षण लागू झाले असते, तर ही संख्या २७३ पर्यंत पोहोचली असती. इतकी मोठी शक्ती संसदेत पोहोचली असती तर देशाच्या धोरणांमध्ये महिलांचा प्रभाव वाढला असता. परंतु, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या बदलाच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. या विधेयकामुळे केवळ सर्वसाधारण महिलांनाच नव्हे, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महिलांनाही मोठा फायदा झाला असता. या प्रवर्गातील राखीव जागांमध्येही मोठी वाढ झाली असती. विरोधकांनी केवळ महिला आरक्षणालाच विरोध केला नाही, तर दलित आणि आदिवासी समाजातील महिलांच्या राजकीय प्रगतीवरही कुऱ्हाड चालवली आहे,” असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला.
काँग्रेसने नेहमीच महिला विरोधी धोरणे स्वीकारली
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर टीका करताना शाहबानो प्रकरणाची आठवण करून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवण्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसने नेहमीच महिला विरोधी धोरणे स्वीकारली आहेत. भाजपने राजस्थान, गुजरात आणि दिल्लीत महिलांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली, पण विरोधकांनी केवळ घराणेशाही जपली आणि महिलांना नेतृत्वापासून दूर ठेवले, असाही आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.
महिलांना त्यांचे हक्काचे स्थान मिळेपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही
आता या पार्श्वभूमीवर केवळ टीका करून न थांबता देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करून जनमताचा कौल विरोधकांना दाखवून दिला जाईल. लवकरच मित्रपक्षांच्या सहभागाने एक मोठा मेळावा घेऊन ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट) आणि काँग्रेसचे नारीशक्ती विरोधी राजकारण उघड केले जाईल. महिलांना त्यांचे हक्काचे स्थान मिळेपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
