माझ्यावर गोळीबार करण्यात आला, लाठ्या काठ्या बरसल्या; फडणवीसांनी सांगितला रामजन्म भूमी आंदोलनाचा अनुभव
राहुल गांधी यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तरुणांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना रामजन्म भूमी आंदोलनाचा अनुभव सांगितला.

राहुल गांधी यांनी पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही नागपुरात जेन-झींशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. त्यांनी रामजन्म भूमी आंदोलनाचेही अनेक किस्से सांगितले. अयोध्यामध्ये पहिल्यांदा गोळीबार पाहिल्याचेही त्यांनी नमूद केले. आंदोलन हिंसक झाल्यानंतर आमच्यावर गोळीबार झाला होता, असा कटु अनुभव देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी ज्या प्रकारे राजकारणात आलो. हा माझा व्यवसाय नाही. ही माझी मिशन आहे. माझा विश्वास आहे की, राजकारण हे साधन आहे की, ज्यामुळे सामिजक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणले जाते. मी 18 वर्षांचा होतो. विद्यार्थी परिषदेने एक निश्चय केला होता. ज्यावेळी श्रीनगरमधील लालचौकावर भारताचा झेंडा फडकत नव्हता. त्यानंतर लालचौकावर झेंडा फडकवण्याचं ठरवलं. मी अवघ्या 18 वर्षांचा होतो. माझ्यासोबत काही जण 16 , काही 17 वर्षांचे होते. असे एकूण 10 हजार जण होते. आम्ही सर्व जम्मूला गेलो. नंतर उधमपूरला गेलो. तिकडे आम्हाला सैन्यांनी रोखल्यानंतर आम्ही चालत श्रीनगरला गेलो. त्यावेळी सैन्याने पुन्हा थांबवलं.
‘आम्हाला ताब्यात घेऊन दिल्लीत आणलं. नंतर प्रधानमंत्र्यांच्या घराला घेराव घातला. आम्हाला लालचौकावर झेंडा लावण्यास दिला नाही, तर तुम्ही जाऊन लावा, असे आम्ही त्यांना सांगितलं. परंतु त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान झेंडा लावू शकले नाहीत. 1992 मध्ये मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लालचौकात झेंडा फडकावला, असेही फडणवीसांनी सांगितले.
‘मी 20 वर्षांचा असताना प्रयागराजला गेलो. तिथून अयोध्येला गेलो. पहिल्यांदा गोळीबार बघितला. आमच्यावर गोळीबार झाला. लाठीचार्ज झाला. आम्हाला ताब्यात घेतलं. त्यानंतर 18 दिवस सेंट्रल जेलमध्ये होतो. बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच आंदोलनात गेलो. 92 साली बाबरीचा ढाचा पाडण्यात आला, त्यावेळी मी तिथे होतो. त्याचा मला अभिमान आहे,असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्टार्टअप्सवरही भाष्य केलं. त्याच्यासाठी वेगळा फंड तयार केल्याचेही सांगितले. स्टार्ट्सअपला राज्य सरकार मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
