लग्नमंडपात मंगलाष्टकं सुरू होण्यापूर्वीच ऐकू आल्या किंकाळ्या अन् काही क्षणांत..; महाराष्ट्रात काळजाचा थरकाप उडवणारी घटना
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे जुन्या वादातून आणि मोबाईल स्टेटसवरून झालेल्या वादात तिघांची हत्या झाली. लग्नमंडपात झालेल्या या थराराची सविस्तर माहिती समोर आली आहे.

मनेश मासोळे, धुळे : एका बाजूला लग्नाची लगबग, अवघ्या काही तासांत घुमणारे मंगल अष्टकांचे सूर आणि आनंदाचे वातावरण… पण काही क्षणांतच या आनंदाचे रूपांतर किंकाळ्या आणि रक्ताच्या थारोळ्यात झाले. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील घोडेमाळ येथे एका लग्नकार्यापूर्वी झालेल्या वादातून ३ जणांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. गुजरातच्या सोनगड येथून आलेल्या वऱ्हाड्यांनीच हा थरार घडवून आणला. यावेळी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर शिवारातील विजू गोसावी यांच्या मुलीचा विवाह गुरुवार १९ फेब्रुवारीला संपन्न होणार होता. बुधवारी १८ फेब्रुवारीला दुपारी साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सुरुवातही झाली. पण अचानक गोसावी समाजातील दोन गटांत जुन्या कौटुंबिक वादाची ठिणगी पडली.
या प्रत्यक्षात वादाचे मूळ कारण मोबाईलवर ठेवलेले स्टेटस असल्याचे समोर आले आहे. या स्टेटसवरून सोनगड गुजरात येथून आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी वधू पक्षातील व्यक्तींना जाब विचारला. यानंतर शाब्दिक चकमक झाली. यानंतर हळूहळू याचे रूपांतर पाहता पाहता हाणामारीत झाले. यावेळी संतापलेल्या आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार चाकूने समोर दिसतील, त्यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामुळे अनेकजण जखमी झाले.
तीन जणांचा मृत्यू
या भीषण हल्ल्यात वधू पक्षातील खालील तिघांचा मृत्यू झाला. सुरेश गोसावी (५०), साहिल गोसावी (३५), देवेंद्र पवार (३०) यात या तीन जणांचा मृत्यू झाला. यावेळी या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या या तिघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, तिथे आता आक्रोश ऐकू येत आहे. एकाच वेळी तिघांचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली. तसेच भीतीचे वातावरण पसरले. परिणामी, होणारे लग्न तातडीने रद्द करण्यात आले. सोनगडहून आलेले अन्य वऱ्हाडी लग्न न लावताच परत रवाना झाले.
या घटनेची भीषणता लक्षात घेता पिंपळनेर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. यावेळी आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून गुजरातच्या दिशेने पळून जात असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवताबारी घाटात (गुजरात सीमा) नाकाबंदी केली. या घाटात मुद्दाम वाहतुकीची कोंडी निर्माण करून संशयित वाहन अडवण्यात आले.
३ जणांना अटक
त्यानंतर पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले. कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी हे दोघेही गुजरातच्या सोनगडचे रहिवाशी आहेत. तसेच महेंद्र गोसावी (कार चालक) अशी या आरोपींची नावे आहेत. सध्या पिंपळनेर आणि घोडेमाळ परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
