‘ऑपरेशन टायगर’ कधीच थांबणार नाही, भर सभेत राजकीय बॉम्ब फोडला; शिंदे गटाच्या बड्या नेत्याने सांगितली आतली बातमी
Uday samant news : मंत्री उदय सामंत यांनी 'ऑपरेशन टायगर'वर मोठं वक्तव्य केलं. सामंत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे.

राज्यात एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले. त्यानंतर एका विधानपरिषद सदस्याला फोडले. मागील दोन महिन्यात 7 लोकप्रतिनिधींना पक्षात सामील करून घेतल्याने शिंदेंच्या खेळीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर नाशिकमधील नगरसेवक देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. परंतु हा दावा ठाकरे गटाने फेटाळून लावलाय. त्यानंतर आता राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांच्या ‘ऑपरेशन टायगर’वरील वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्री उदय सामंत यांनी भर सभेत म्हटलं की, ऑपरेशन कधीच थांबणार नाही. ऑपरेशन दरदिवशी सुरू राहणार आहे. महानगरपालिकेतील नगरसेवक असतील. महाविकास आघाडीतील आमदार, माजी आमदार असतील. त्यांचे खासदार आणि माजी खासदार असतील. हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिसतील. अशा प्रकारे शिवसेना पक्ष गडचिरोलीपासून सावंतवाडीपर्यंत वाढतोय’.
शिंदे दिल्ली दौरा, राजकीय घडामोडींना वेग
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. दुपारनंतर ते दिल्लीत रवाना होणार आहे. दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. या दौऱ्यात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच शहरात ठाकरेसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नाशिक महापालिकेतील 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना बुधवारी थेट मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावलं. स्थानिक नेत्यांकडून या केवळ अफवा असल्याचा दावा केला जात आहे. परंत खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा रद्द करून आता थेट मातोश्रीवरूनच परिस्थिती हाताळली जात असल्याचे समोर येत आहे.
