Devendra Fadanvis : डीलिमिटेशनमुळे SC, ST च्या जागा वाढल्या असत्या, विरोधकांकडून त्यांचाही विश्वासघात – फडणवीसांचा हल्लाबोल
संसदेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिल नामंजूर झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलाविरोधी मानसिकता दाखवत ७० कोटी महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. हे विधेयक मंजूर न झाल्याने अनुसूचित जाती-जमातीच्या जागांवरही परिणाम झाल्याचे ते म्हणाले. याविरोधात राज्यात १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करून जनजागृती करणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.

संसदेत शुक्रवारी ( 17 एप्रिल) महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर मतदान झालं. मात्र हे बिल मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतीयांश मत न मिळाल्याने संसदेमध्ये हे बिल नामंजूर झालं. हे बिल मंजूर होण्यासाठी 360 मतांची गरज होती, मात्र 62 मत कमी मिळाल्याने हे बिल मंजूर झालं नाही. मात्र याच मुद्यावरून आता सरकारने विरोधकांवर हल्लाबोल चढवला असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेससह सर्व विरोध पक्षांवर हल्ला चढवला. ‘ काँग्रेस, डीएमके, तृणमूल, उबाठा गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, समाजवादी पक्ष, अशा सर्व पक्षांनी आपल्या महिलाविरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकला आवश्यक ती दोन तृतीयांश मतं मिळू दिली नाहीत. 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीने करण्यात आली ‘ असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडलं.
‘लोकशाहीमध्ये महिलांच्या सहभागाचा मृत्यू झाला, हत्या झाली आणि त्याचे हत्यारे सगळे विरोधी पक्ष आहेत. पुरूषी मानसिकता, रिग्रेसिव्ह मानसिकता समोर आणली. त्यांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाहीय, त्यांना विरोध करायचा आहे,’ असं फडणवीस म्हणाले. ‘ याचा दुसरा परिणाम असा की केवळ महिलांच्याच नव्हे नव्हे, तर जेव्हा या जागा वाढल्या असत्या तेव्हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या जागाही वाढल्या असत्या. हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे, आमच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या जागा आणि प्लस अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या महिलांच्या जागा, यावरदेखील विरोधकांनी मोठी कुऱ्हाड चालवली आहे, त्यांचाही विश्वासघात केला’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काँग्रेसवर टीकास्त्र
संसदेचा विचार केला तर 73 महिला आहेत, जर हे विधेयत मंजूर झालं असतं तर 273 महिला संसदेत गेल्या असत्या. पण यांनी केलेलं काम निश्चितपणे चुकीचं आहे. काँग्रेस आणि साथीदारांची नेहमी अशीच प्रवृत्ती राहिली आहे. त्यांनी सातत्याने महिला विरोधी धोरणं घेतली. शाहाबानो केस असेल , संशोधन करून सर्वोच्च न्यायालयचा निकाल बदलणारी ही काँग्रेस पार्टी आहे अशी टीका फडणवीसांनी केली. भाजपावर अनेक आरोप केलेत पण राजस्थानच्या मुख्यमंत्री, गुजरात, दिल्ली अशा ठिकाणी भाजपच्या कार्यकाळत महिला मुख्यमंत्री झाल्यात, त्या बाजपच्या नेत्या होत्या. याधी वर्षानुवर्ष काँग्रेसचं राज्य होतं पण एकाही महिलेला त्यांनी मुख्यमंत्री बनू दिलं नाही, असा आरोप फडणवीसांनी केला.
राज्यातून 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करत करणार जनजागृती
या पक्षांकडे कोणताही प्रतिवाद नाही. माझ्या स्तरातील कोणत्याही नेत्याने माझ्यासोबत महिला विधेयकासंदर्भात ओपन डिबेट करावं, यात काय चूक आहे ते दाखवावं, पण कोणी करणार नाही, करू शकत नाही. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे यांनी सुरू केलं आहे, याविरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत. महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या होत असेल तर त्याविरुद्द लोकशाहीमध्ये जनमताचा रेटा यांच्या लक्षात येईल, तेव्हा हे महिला आरक्षणाला मान्यता, पाठिंबा देतील.
महायुतीतले सर्व पक्ष आपापल्या परीने महिलांना संघटित करण्याचे काम करू, राज्यातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत, जनजागृती करणार आहोत, आम्ही मेळावा बोलावला आहे, तिथे देखील आमच्या मित्र पक्षांना निमंत्रित करू असं मुख्यमंत्री म्हणाले. महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
