Nashik Vidhan Parishad : हे आमच्या रक्तातच नाही..; दराडेंच्या विश्वासघाताच्या आरोपांवर गिरीश महाजन स्पष्टच बोलले
विधान परिषद निवडणुकीत नाशिकच्या मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी महायुतीवर विश्वासघाताचा आरोप केला. यावर आता गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचं वर्चस्व प्रस्थापित झालं असलं तरी नाशिक मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला असून शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाले आहेत. या पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी महायुतीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीने माझा विश्वासघात केला, असं ते म्हणाले. या आरोपांवर आणि नाशिकच्या धक्कादायक निकालावर आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “हा निकाल आमच्यासाठीही अत्यंत धक्कादायक आहे. हा पराभव का झाला, कशामुळे झाला, कोण आमच्या बाजूने उभं राहिलं नाही, याबाबत चौकशी केली जाईल. मात्र दराडे सध्या पराभवामुळे वेगळ्या मनस्थितीत आहेत. आम्ही असं कधीच करणार नाही, आमच्या ते रक्तातच नाही”, असं महाजन म्हणाले.
काय म्हणाले गिरीश महाजन?
“हा निकाल आमच्यासाठीही अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही खूप प्रयत्न केले. शेवटच्या दिवशी मी पूर्ण वेळ बूथवर होतो. तरीही मतदारांनी कौल आमच्या बाजूने दिला नाही. याठिकाणी महायुतीची पावणे पाचशे मतं होती. 620 पैकी जवळपास पावणे पाचशे मतं महायुतीची होती. तरीसुद्धा इतकी कमी मतं पडली. याचं कारण शोधण्याची गरज आहे. मी एकनाश शिंदे साहेबांना भेटणार आहे. उदय सामंत यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. का झालं, कशामुळे झालं, कोण याठिकाणी आमच्या बाजूने उभं राहिलं नाही, हा खरा संशोधनाचा विषय आहे. याबाबत चौकशी केली जाईल”, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.
दराडेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया
दराडेंच्या महायुतीवरील आरोपांवर ते पुढे म्हणाले, “नरेंद्र दराडे यांनी म्हटलंय की महायुतीने विश्वासघात केला आणि त्यात त्यांनी माझंही नाव घेतलंय. सध्या पराभवामुळे ते वेगळ्या मनस्थितीत आहेत. पण त्यांनाही कल्पना आहे, एकनाथ शिंदेंना, उदय सामंतांना, दादा भुसेंनाही माहीत आहे की आम्ही त्याठिकाणी किती प्रयत्न केले होते. मी असा माणूसच नाही, माझ्या ते रक्तातच नाही.. ओठात काही पोटात काही.. 40 वर्षांच्या राजकारणात हा माझा कधीच स्वभाव राहिलेला नाही. पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला आहे. याचा धक्का आम्हाला बसला आहे. मी आधीपासूनच म्हणत होतो की 17 पैकी 17 जागा आमच्याच येतील. विरोधी पक्षाला खातंसुद्धा उघडता येणार नाही. ते तंतोतंत खरं झालेलं आहे. नाशिकची वगळली तरी ती जागासुद्धा विरोधी पक्षाला मिळालेली नाही. राज्यात विरोधकांचा अत्यंत दारूण पराभव झाला आहे. पराभूत झाल्यामुळे नरेंद्र दराडे वेगळ्या मानसिकतेत आहेत. त्यांनी महायुतीवर आरोप करणं चुकीचं आहे. असं करणं आमच्या रक्तात नाही, ही आमची संस्कृतीच नाही.”
