आता पनवती म्हणाले… हर्षवर्धन सपकाळांचा पत्रकार परिषदेत पंतप्रधानांवर पुन्हा हल्लाबोल
Sapkal vs Modi : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सपकाळ यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे.

राज्यात गेल्या काही काळापासून राजकारणाचा स्तर घसरलेला आहे. अनेक नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. नाशिकच्या चांदवड तालुक्यात आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभाव मिळावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका केली होती. सपकाळ यांनी मोदींचा उल्लेख द*** असा केला होता. यावर त्यानंतर आज पुन्हा सपकाळ यांनी यावर भाष्य केले आहे.
नरेंद्र मोदी पनौती आहेत – सपकाळ
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांना पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आले. यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, मी कुठलाही चुकीचा शब्द वापरेला नाही. द*** हा शब्द लक्षण दर्शविणारा शब्द आहे. दरिद्री या संस्कृत शब्दाचा बोलीभाषेत रुळल्यानंतर द*** हा शब्द तयार झाला. मोदी आल्यापासून शेतमालाचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. अशा संदर्भावर मी काल त्यांचा तो उल्लेख केला. संस्कृतमधील तो शब्द भाजपवाल्यांना खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे पनोती आहेत, हा जरा समजेल असा शब्द प्रयोग मी करतो.’
काय म्हणाले होते सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ यांनी काल म्हटले होते की, ‘मोदी यांनी आजू-बाजूच्या देशांसोबत **** घेतली आहे. जो पर्यंत **** खुर्चीवर आहे तो पर्यंत कांदा त्या देशात आयात होणार नाही. बांगलादेश श्रीलंका आपला कांदा घेणार नाही. नरेंद्र हा **** आहे. एपस्टीन फाईलमध्ये मोदींनी काय काय केलं ज्यामुळे ते ट्रम्प यांचे ऐकत आहेत? मोदींमुळे आपले चांगले होऊ शकत नाही. कांदा खरेदी आता APMC मधेच झाली पाहिजे. झोपेच सोंग करणारे खोट सरकार आहे. मोदींना बैलगाडीत बसून त्याची हिमालयात विल्हेवाट लावा.’
सपकाळ यांची फडणवीसांवरही टीका
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, ‘सरकार तुपाशी शेतकरी उपाशी अशी अवस्था आहे. मी तुमचा कांदा खाल्ला आहे, मी बेइमानी करणार नाही. नालायक म्हणायचे ह**** म्हणायचे, कांदाखोर म्हणायचे, असे हे नालायक सरकार आहे. फडणवीस तर गद्दार माणूस आहे. 24 रुपयांनी कांदा खरेदीचे आश्वासन दिलेले होते. फडणवीस म्हणाले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही आणि लग्न केले. त्यामुळे ते महाराष्ट्राचे खोटारडे मुख्यमंत्री आहेत.’