सुनील तटकरेंच्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी कशी मिळाली? कुठे तडजोड झाली? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
कोकणातील रायगड -रत्नागिरी -सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान गुरुवारी कोकणातील रायगड -रत्नागिरी -सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीतून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं ही निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. या मतदारसंघातून महायुतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. बाळ माने यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच शिवसेना शिंदे गटाकडून देखील दावा करण्यात आला होता. परंतु त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा विरोध मावळला आणि या मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली. दरम्यान अनिकेत तटकरे यांना उमेदवारी नेमकी कशी मिळाली? त्या ठिकाणी नेमकी काय तडजोड झाली? यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
कोकणाकील जेवढे काही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत, ते सर्व सुनील तटकरे यांच्याविरोधात होते, हे सर्व आपल्याला माहीत आहे. परंतु आता तडजोड झाली आहे. पूर्वी हे सर्व नेते काय म्हणायचे तर सुनील तटकरे आसेच आहेत तसेच आहेत, ते आपल्या पक्षाला अडचण करतात. परंतु मला वाटतं आता पालकमंत्रिपदाची तडजोड त्या ठिकाणी झाली असावी, असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी यावेळी केला आहे. परंतु मला असं वाटतं की ते जर सुनील तटकरे यांच्यावर विश्वास ठेवत असतील तर ते एक वेगळ्याच स्वप्नात आहेत, असा टोलाही यावेळी रोहित पवार यांनी लगावला आहे.
तटकरेंवर हल्लाबोल
दरम्यान सुनील तटकरे यांनी असं म्हटलं आहे की, रोहित पवार यांनी दुसऱ्यांच्या पक्षात लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षात लक्ष द्यावं, याला देखील यावेळी रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. का नाही देणार? आम्ही बोलणार तुम्ही जिथे चुकणार तिथे आम्ही बोलणार. ते म्हणत आहेत की, मी खूप कष्ट घेतले, तुम्ही जर कष्ट घेतले असते तर घड्याळाची कोकणात वाताहात झाली नसती. तुम्ही जेव्हापासून तिथे लक्षं घातलं, तेव्हापासून तुम्ही फक्त तुमच्या परिवाराचाच विचार केला. पक्षाचा विचार कधीही केला नाही, म्हणून खऱ्या अर्थाने पक्षाचं नुकसान झालं आहे, असा हल्लाबोल यांनी रोहित पवार यांनी तटकरेंवर केला आहे.
खरात प्रकरणावर प्रतिक्रिया
खरात प्रकरणात बळीचा बकरा कोणाला केलं तर ते फक्त रुपाली चाकणकर यांना केलं गेलं. त्यांचे दोन्ही पदं गेले. त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. ते पद जायलाच पाहिजे, होतं त्यात आम्ही वेगळं काही बोलणार नाही. मात्र त्यांच्यासोबत इतर काही मोठे नेते होते, त्यांची प्रगती होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे त्यातला एक खासदार, एक मंत्री आणि आमदार आणि आता एक विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आमदार झाला. म्हणजे एका व्यक्तची सर्व पदे काढली जातात, मात्र दुसरीकडे ती वाढवली जातात असा टोला खरात प्रकरणात रोहित पवार यांनी तटकरे यांचं नाव न घेता त्यांना लगावला आहे.
