आमच्या मतामुळे तुम्ही मुख्यमंत्री बनलात, आम्ही घरी येऊन तुम्हाला… उद्धव ठाकरेंच्या विधानावर बच्चू कडूंचा पलटवार
Bachchu Kadu : उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोला केला होता. मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली असं म्हटलं. यावर आता बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे.

बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोला केला होता. मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली, जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होती. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या मतांमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, आम्ही घरी येऊन तुम्हाला पाठिंबा दिला होता असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंची कडूंवर टीका
बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते नाराज झाले होते. मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कडू यांच्यावर टीका केली होती. ‘आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद आहे.’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
एकनाथ शिंदेंनी आम्हाला उद्धव ठाकरेंकडे नेलं – कडू
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटले की, ‘उद्धव साहेबांकडून मला ही अपेक्षा नव्हती. पहिले ते मुख्यमंत्री झाले की, बच्चू कडू राज्यमंत्री झाले याचं उत्तर त्यांनी द्यावे. त्यावेळी माझ्याकडे दोन आमदार होते. मी शिवसेनेविरोधात निवडणूक लढवून विजयी झालो होतो. निवडणुकीनंतर आम्हाला सर्व पक्षाकडून निमंत्रण होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि उद्धव साहेबांसोबत भेट घालून दिली. त्यावेळी आम्हाला वाटलं की उद्धव साहेबांना आपण पाठिंबा दिला पाहिजे.’
आमच्या मतांमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात – कडू
पुढे बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की, ‘मला एका प्रश्नाच उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे की, आम्ही घरी येऊन तुम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. आम्ही त्यावेळी कदाचित पाठिंबा दिला नसता तर चित्र वेगळं असू शकलं असतं. त्यावेळी आम्ही 7 अपक्ष तुमच्यासोबत ठामपणे उभे राहिलो. पहिले तुम्ही आम्हाला मंत्री केलं नाही, आमच्या मतांमुळे तुम्ही मुख्यमंत्री बनलात. हे लक्षात घ्या. हे मी बोलणार नव्हतो, कारण आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर कायम आहे. तुम्ही हा विषय काढायला नको होता. आता लोकांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून मी बोलत आहे.’
