Rain Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचं संकट, 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट; तुमच्याकडे सरी बरसणार का?
शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे 24 फेब्रुवारी रोजी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra IMD Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हवामानात काहीसा बदल जाणवत आहे. वातावरणातील गारवा नाहीसा होऊन आता तापमानात वाढ होताना दिसत आहे. वातावरणात गरमी जाणवत असताना आता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील इतरही काही राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवत असताना महाराष्ट्रातील एकूण 11 जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी रात्रीपासून वातावरणात बदल झालेला पाहायला मिळत आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस?
हवामान विभागाने 23 तसेच 24 फ्रेब्रुवारी अशा दोन दिवसात राज्यात अने ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या शक्यतेनुसार 23 तारखेला मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी पासवाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या. आता 24 फेब्रुवारी रोजीदेखील राज्यातील सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सातूर, धाराशीव, चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांचे मत काय?
तज्ज्ञांच्या मतानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतून येत असलेल्या आर्द्रतेमुळे तसेच स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे पावसाचे ढग तयार होत आहेत. यातूनच पाऊस बरसतो आहे. या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा, गहू तसेच रबी पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. राज्यात अनेक ठिकाणी पीक काढणी चालू आहे, असे असताना अवकाळी पाऊस आल्याने मोठा फटका बसू शकतो. त्यामुळेच हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी?
दरम्यान, पावसाची ही शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली असेल तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. कापलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून जाणार नाही, याची काळजी घ्यावी. या अवकाळी पावसामुळे आता इतर दैनंदिन कामांतही अडथळा निर्माम होऊ शकतो.
