चालत्या बाईकवरुन मुल पडले, आई-वडीलांना कळलंच नाही, दारुच्या नशेने…
पोलिसांनी वाहन चालवताना मद्यधुंद होऊन चालवू नये तसेच लहान मुलासोबत प्रवास करताना त्यांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

चंद्रपूर येथे पती आणि पत्नी मोटर सायकलवरुन जात असताना धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. चिमूर तालुक्यातल्या भिशी बायपास मार्गावरुन हे दाम्पत्य जात असताना त्यांच्या सोबत अडीच वर्षे आणि चार महिन्यांची दोन मुले देखील होती. मात्र, हे दाम्पत्य मद्याच्या नशेत असल्याने त्यांच्या हातून चार महिन्याचे मुल रस्त्यात पडल्याचे त्यांच्या तब्बल ४०० मीटरपर्यंत लक्षात आले नसल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भिशी बायपास मार्गावर ही घटना घडली आहे. येथे दारुच्या नशेत धुंद असलेल्या दाम्पत्याच्या हलगर्जीने चार महिन्याचा निष्पाप जीवाला फटका बसला असता. या चार महिन्याचे चिमुरडे आपल्या हातून रस्त्यात पडले आहे याची शुद्ध देखील या पालकांना नव्हती. या दाम्पत्याचा पुढे अपेक्षेप्रमाण मद्यधुंद असल्याने अपघात झाला.
ही घटना बुधवारी रात्री भिसी बायपास येथील मौली ढाबा येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फूलचंद राऊत आणि त्याची पत्नी मीरा राऊत त्यांच्या चार महिन्याचा बालक आणि अडीच वर्षांच्या चिमुरडी सोबत स्प्लेंडर बाईकने नागपूर येथील नांदा येथून चिमूर येथील नातेवाईकांच्या घरी चालले होते. या घटनेतील दोघा नवरा – बायकोने प्रचंड दारु पिली होती.
दाम्पत्य चारशे मीटर पुढे गेले तरी त्यांना कळले नाही
प्रवासादरम्यान चार महिन्याचे बाळ आईच्या मांडीवर झोपले होते. रस्त्यात अचानक ते आईच्या कुशीतून घसरुन रस्त्यात पडले तरी दारुच्या नशेमुळे या दाम्पत्याला काही समजलेच नाही. बाईकने हे दाम्पत्य चारशे मीटर पुढे गेले तरी त्यांना याचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर या बाईकचा अपघात झाला पती-पत्नी आणि त्याच्या सोबतचा अडीच वर्षांची चिमुरडी खाली कोसळले. त्यानंतर त्यांना कळले नाही की त्यांचे चार महिन्यांचे बाळ रस्त्यातच पडले आहे.
त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या लोकांची नजर या बाळाकडे गेली. त्यांनी या बाळाला सुरक्षित स्थानी नेले आणि भिसी पोलिसांना कळवले, त्यानंतर काही अंतरावर हे दामप्त्य देखील जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसते. या संदर्भात तक्रार येताच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी आधी चार महिन्याचा बाळाला रुग्णालयात पोहचवले. तेथे त्याच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आणि त्याचे प्राण वाचले आहेत. देव तारी त्याला कोण मारी अशी ही घटना घडली आहे.
…तर एखाद्या वाहनाच्या खाली हे बाळ आले असते
त्यानंतर जखमी पालकांना आणि त्यांच्या मुलीला रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी त्यांना कळाले की हे रस्त्यात पडलेले मुल त्यांचे आहे. जर पादचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवले नसते तर एखाद्या वाहनाच्या खाली हे बाळ आले असते. या दाम्पत्याच्या विरोधात ड्रंक एंड ड्राईव्ह अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे.
