हवामानात मोठे बदल, भारतीय हवामान विभागाचा थेट येलो अलर्ट, उष्णतेसह…
हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाचे चटके अधिक जाणवताना दिसत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे.

राज्यासह देशातील हवामानात मागील काही दिवसांपासून सतत मोठे बदल होत आहेत. थंडी, उष्णता आणि पाऊस अशी स्थिती सध्या आहे. मागच्या आठवड्यात राज्यातील काही भागात मोठा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सळो की पळो झाले. रब्बीचे हाताशी आलेले पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. राज्यातील जवळपास भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अजूनही काही राज्यात पाऊस सुरू असल्याची स्थिती आहे. नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीच्या वेळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. 1 जानेवारीपर्यंत राज्यात थंडी होती. मात्र, त्यानंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली, ज्यानंतर थंडी गायब झाली. फेब्रुवारी महिन्यात उष्णता, पाऊस आणि थंडी असे तिन्ही हंगाम बघायला मिळाले. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यात उष्णता आणि दमट वातावरण बघायला मिळतंय.
कालच भारतीय हवामान विभागाने उष्णता आणि दमट वातावरणाकरिता येलो अलर्ट जारी केला होता. आजही भारतीय हवामान विभागाने कोकणात दमट आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट जारी करून सतर्कतेचा इशारा दिला आहे. राजस्थानच्या सिकार येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. सिकार येथे 12.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 38.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 13.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तापमान चढउतार बघायला मिळेल. कोकणात येलो अलर्ट जारी करण्यात आला. आज दिवसभर उष्णता राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
पुणे शहर आणि परिसरात तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सियस जास्त असून कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शहर आणि परिसरात तापमान वाढ झाली आहे. सलग दोन दिवस शिवाजीनगर येथे 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसत आहेत.
