Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर हायवे रोखला, मोठी घडामोड काय?

Maratha Protest on Dhule Solapur Highway: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांनी उपचारांना नकार दिल्याने प्रकृती खालावली आहे. त्यांच्या काळजीने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरला आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर हायवे रोखला, मोठी घडामोड काय?
मराठा आंदोलक, धुळे -सोलापूर महामार्ग
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 02, 2026 | 12:01 PM

मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदी प्रमाणपत्र, पडताळणीत रद्द करण्यात येत असल्याच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची हाक दिली. 29 ऑगस्टपासून जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना नकार दिला आहे. कालपासून त्यांची तब्येत अचानक खालावली आहे. त्यांना उलट्याचा त्रास सुरू झाला. तर आजही त्यांच्या तब्येतीची वार्ता समजताच मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी धुळे-सोलापूर हायवे रोखून धरला आहे. यामुळेच एकच गोंधळ उडाला आहे. रस्त्याच्या दुर्तफा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आंदोलकांना समजावण्यात येत असले तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला जाण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काल त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. सलग पाचव्या दिवशी उपोषण सुरू असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावल्यानंतर उपोषणस्थळी मराठा बांधव गर्दी करत आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत अंतरवालीतील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा ओघ सुरूच आहे. रात्रीच्या दीड वाजताही उपोषणस्थळी मोठी गर्दी दिसली. जरांगे पाटील उपचार घेत नसल्याने मराठा बांधवांमध्ये काळजी वाढली आहे.

मराठा आंदोलक आक्रमक, महामार्ग रोखला

आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. तरीही सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल न झाल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. शासकीय अधिकारी हे जरांगे पाटील यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. ते त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करत आहेत. त्यांनी सरकार काय प्रयत्न करत आहे. प्रशासकीय स्तरावर काय काय बदल झाले आहेत, याची माहिती त्यांना दिली आहे. पण अधिकाऱ्यांशी नाही तर सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीत येऊन चर्चा करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. यामुळे पेच वाढला आहे.

जरांगे यांची ही अवस्था पाहून वातावरण तापले आहे. त्यातच मराठा आंदोलक मोठ्या संख्येने धुळे-सोलापूर महामार्गावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काही आंदोलकांनी शेजारच्या शेतातील लाकडी ओंडके रस्त्यावर टाकले आहेत. अनेकांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा यावेळी दिसून आला. अनेक आंदोलकांनी महामार्गावरच आडवे होत रस्ता अडवला. रस्ता रोखून धरल्याने आता दोन्ही बाजूंनी वाहनं थांबली आहे. आंदोलक ऐकण्याच्या मनस्थिती दिसले नाही. काही जण फोनवरून याविषयीची माहिती देत होते. गेल्या आंदोलनावेळी असाच प्रकार झाल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी फोनवरून त्यांना समजावले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us