Ketan Agarwal Case : सियाच खूनी असल्याचा सर्वात आधी संशय कुणाला आला? केतनच्या वडिलांनी दिली धक्कादायक माहिती
केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला अपघात वाटलेला केतनचा मृत्यू खून असल्याचे सिद्ध झाले असून, त्याची होणारी बायको सिया गोयलच खुनी निघाली. केतनच्या वडिलांना सियाच्या निर्विकार चेहऱ्यामुळे तिच्यावर पहिला संशय आला. त्यांच्या याच धाडसी निरीक्षणामुळे सियाचा क्रूर कट उघडकीस आला आणि सत्य जगासमोर आले.

केतन अग्रवाल प्रकरणात आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी केतनचा अपघाती मृत्यू झाल्याचं दिसत होतं. केतनचा पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास वर्तवला जात होता. पण नंतर मात्र, केतनचा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं आहे. केतनची होणारी बायको सिया गोयल हिनेच त्याचा काटा काढल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तापस केला. त्यानंतर सर्व सत्य समोर आलं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सियावर आधी कुणाचाच संशय नव्हता. पण तिच्यावर सर्वात पहिला संशय केतनच्या घरातील एका व्यक्तीला आला होता. त्यामुळेच सिया पकडल्या गेल्याचं समोर आलं आहे.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी घटना कशी घडली याची माहिती दिली. तसेच ते घटनास्थळी गेल्यावर जे घडलं ते सांगतानाच त्यांचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं आहे. विशेष म्हणजे सियावर सर्वात पहिला संशय त्यांनाच आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही घटनास्थळी गेलो. तेव्हा पोलिसांनी दरीतून केतनची बॉडी आणली. त्याची बॉडी आणल्यानंतर आम्ही हंबरडा फोडला. रडारड सुरू झाली. पण सिया अत्यंत शांत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते, तेव्हाच तिच्यावर संशय आल्याचं विशाल अग्रवाल यांचं म्हणणं आहे.
विशाल अग्रवाल यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना घटनेच्या आधीपासूनचा तपशील सांगितला. सिया रवीकुमार गोयल असं आरोपीचं नाव आहे. गोयल कुटुंबाचा मार्केट यार्डमध्ये स्पायसेसचा शॉप आहे. बीजी गोयल अँड कंपनीच्या नावाने ते काम करतात. फेब्रुवारीमध्ये सिया आणि केतनचा साखरपुडा झाला होता. 19 तारखेला सियाचा वाढदिवस होता. त्यावेळी तिने प्री बर्थडे सेलिब्रेशन करायचा हट्ट केला, खूप जिद्द केली. त्यामुळे केतनही तयार झाला. 18 तारखेला ती केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. 8 वाजून 20 मिनिटाने तो घरातून निघाला होता. 10.45 वाजता आम्हाला कळलं की केतन किल्ल्यावरून दरीत कोसळला, असं विशाल अग्रवाल यांनी सांगितलं.
ती गोष्ट खटकली
ही माहिती मिळाल्यावर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यानंतर पोलिसांनी दरीतून केतनचा मृतहेद शोधून आणला. त्याचं निधन झालं होतं. सुरुवातीला हा घात आहे, असं आम्हाला वाटलं नाही. आम्हीही हा अपघातच आहे, असं समजत होतो. पण त्याची बॉडी आणली तेव्हा सियाची कोणतीही रिॲक्शन नव्हती. तिला काहीच दु:ख वाटलं नाही. आम्हाला ती गोष्ट खटकली. आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं, असं अग्रवाल म्हणाले.
