Ladki Bahin Yojana : 5 लाख महिलांचं नाव वगळल्यावर लाडक्या बहिणींचे पैसेही परत घेणार ? सरकारने काय सांगितलं ?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 या महिन्याभरात 5 लाखांनी कमी झाली. लाखो महिला अपात्र ठरल्याने हाँ आकडा 2.46 कोटींवरून हा आकडा 2.41 कोटींवर आला.

महायुती सरकारची ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही महत्वाकांक्षी योजना पहिल्याच दिवसापासून चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात. मात्र आता सरकारने या योजनेतील लाभर्थ्यांची पडताळणी सुरू केली असून त्याची धास्ती अनेक महिलांचा मनात आहे. याचदरम्यान लाडकी बहीण योजने मधून 5 लाख महिलांची नावे हटवण्यात आली असून, त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. डिसेंबरमध्ये लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटी होती तर जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 2.41 कोटी इतका होता. मात्र आता ज्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, याबद्दल सरकारकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. नाव वगळण्यात आलेल्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेची घोषणा झाल्यानंतर जुलै ते जिसेंबर या कालावधीत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात एकूण 450 कोटी रुपये ट्रान्स्फर झाले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ही रक्कम परत घेण्यात आलेली नाही आणि तसे करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही. ज्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे त्यांना पुढील लाभ मिळणार नाहीत, परंतु आधीच जमा केलेली रक्कम काढणे योग्य होणार नाही, असेही तटकरे यांनी नमूद केलं.
5 लाख महिला अपात्र का ठरल्या ?
महिला व बालविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, विविध कारणांमुळे पाच लाख महिला अपात्र ठरल्या. त्यानंतर, सरकारच्या या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 2024 मधील 2.46 कोटींवरून घटून गेल्या महिन्यात 2.41 कोटी झाली आहे. अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांपैकी 1.5 लाख महिला या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत. तर 1.6 लाख महिलांपैकी काहीकंडे एकतर चारचाकी वाहने आहेत किंवा त्यापैकी काही जणी या नमो शेतकरी योजनेसारख्या इतर सरकारी योजनांच्या लाभार्थी आहेत.
महिलांना सशक्त करण्याचे लाडकी बहीण योजनेचे लक्ष्य
“संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुमारे 2.3 लाख महिलांना लाभ मिळत होता, ज्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले,” असे अधिकाऱ्याने सांगितले. लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू करण्यात आली होती. महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करणं हे या योजनेचं लक्ष्य आहे. लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. विधासभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात या योजनेचा सिंहाचा वाटा आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष काय ?
महायुती सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार, 21-65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात. लाभार्थी महिलांकडे चारचाकी वाहन नसणे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसणे यांचा या योजनेच्या अटीत समावेश होतो.
नोव्हेंबर मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने 230 जागा जिंकल्या. ही निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर आलो तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र, या योजनेवर विरोधकांकडून सातत्याने हल्लाबोल करण्यात आला.
