उद्या मुलीचं लग्न… पण असं काय घडलं, ज्यामुळे तणावाखाली संपूर्ण कुटुंब
घरातील मुलीचं लग्न असल्यास घरात आनंद तर असतोच, पण मनात एक दडपण देखील असतं... पण नाशिक येथील बेलसरे यांच्या मुलीचं उद्या लग्न आहे, पण आज असं काय घडलं ज्यामुळ संपूर्ण कुटुंब तणावाखाली आहे...

घरात लग्नकार्य असेल तर, सर्व गोष्टी लग्नाआधीच ठरवल्या जातात… लग्नामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असताने असं काही घडतं ज्यामुळे कार्य कसं पार पडणार? असा प्रश्न निर्माण होतो आणि संपूर्ण कुटुंबिय तणावाखाली असतात. आता देखील असंच काही झालं आहे. इराण–अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. इराण-इस्रायल युद्धानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्रातील नाशिकमध्येही दिसून येतो. येथे एलपीजी गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे एका कुटुंबाच्या आनंदावर मोठं संकट आलं आहे.
मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असलेल्या बेलसरे कुटुंबाला आता पाहुण्यांसाठी जेवण कसं बनवायचं याची सर्वात मोठी चिंता भेडसावत आहे. नाशिकच्या सहारा भागात राहणाऱ्या बेलसरे कुटुंबात सध्या लग्नाचं वातावरण असायला हवं होतं, परंतु गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली आले आहे.
बेलसरे कुटुंबियांची लेक खुशबू हिचं उद्या म्हणजे 14 मार्च रोजी लग्न आहे… लेकीचं लग्न असल्यामुळे तब्बल 2 हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. खुशबू हिचे वडील सुनील बेलसरे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी गॅस पुरवठा करणाऱ्यांशी संपर्क साधला… पण सिलेंडर उपलब्ध होतच नसल्यामुळे, त्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.
सुनील बेलसरे यांनी आरोप केले आहेत की, ‘बाजारात गॅसचा काळाबाजार सुरु आहे… आम्ही सिलेंडरची व्यवस्था करण्याचे पूर्ण प्रयत्न केले, पण अनेक ठिकाणी जास्त दरात सिलेंडरची विक्री होत आहे…’, सध्या, बेलसरे कुटुंब गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून लग्न समारंभ कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडेल…
पिंपरी-चिंचवडमधील माने कुटुंबातील मुलीच्या लग्नात देखील संकट
आखाती देशांतील युद्धाचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू लागला आहे. लग्नसमारंभात वऱ्हाडी मंडळींच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होण्याची वेळ आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील माने कुटुंबातील मुलीचे लग्न येत्या रविवारी, म्हणजेच 15 मार्च रोजी होणार आहे. मात्र कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने केटरर्सनी गॅसची व्यवस्था करण्याबाबत कुटुंबाला सूचना दिल्या आहेत.
दोन महिन्यांपूर्वी हे लग्न ठरवून 15 मार्चचा मुहूर्त काढण्यात आला होता. पण त्याच दरम्यान अचानक आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होईल आणि त्याचा परिणाम थेट आपल्या लग्नसमारंभावर होईल, असे माने कुटुंबाला कधीच वाटले नव्हते. आता मात्र या परिस्थितीमुळे माने कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांना मदतीची गरज भासत आहे.
