Maharashtra Budget 2026-27 : किती लाखापर्यंतची काम निविदेशिवाय मिळणार, स्टार्टअप्ससाठी काय महत्वाची घोषणा?
Maharashtra Budget 2026-27 : "या संस्थेच्या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा कौशल्य, आर्थिक मार्गदर्शन केलं जाईल. समुपदेशन सेवेचा विस्तार 36 नवदिशा केंद्र स्थापन करण्यात येईल" अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली. त्यात स्टार्टअप्ससाठी केलेल्या काही घोषणा महत्वाच्या आहेत, त्या जाणून घ्या. “जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण दक्ष महत्वाकांक्षी प्रकल्प राबवतोय. त्यासाठी महिमा महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अॅडव्हान्समेंट संस्थेची स्थापना केली जाईल. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा कौशल्य, आर्थिक मार्गदर्शन केलं जाईल. समुपदेशन सेवेचा विस्तार 36 नवदिशा केंद्र स्थापन करण्यात येईल” अशा घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“मला सांगताना अभिमान वाटतोय केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र देशाचा स्टार्ट अप कॅपिटल ठरला आहे. युनिकॉनच्या संख्येत आपलं राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी नवीन स्टार्टअप नावीन्य धोरण 2025 जाहीर केलय. पुढच्या पाचवर्षात 1 लाख 25 हजार उद्योजक घडवणं, 50 हजार स्टार्टअप्सना बळ देणं हा उद्देश आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
किती लाखापर्यंतची काम निविदेशिवाय दिली जाणार?
“तळागाळातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योजक महाफंड स्थापन करत आहोत. त्यातून निवडक स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत दिली जाईल. या उपक्रमातंर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअप्सची निवड केली जाईल. त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प शासन विभागात राबवण्यासाठी 25 लाख रुपयापर्यंतची काम निविदेशिवाय थेट दिली जातील” असं मुख्यमंत्री म्हणाले.
बिरसा योजना काय?
“चर्मकार डिझाइन उत्पादन केंद्र वांद्रे येथे स्थापित करण्याचे प्रस्तावित आहे. नवीन उद्योजक केंद्र, सर्व सुविधांसह बांधण्याचा प्रस्ताव आदिवासी जमातीतील युवकांना नावीन्यतेच्या आधारावर उद्योजक बनवण्यासाठी भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्ट फॉर आत्मनिर्भरता बिरसा ही योजना राबवणार आहोत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.
