
जळगावमधील भाजपचे सर्व नवनियुक्त नगरसेवक मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी नाशिकला रवाना झाले आहेत. महापालिकेत भाजपचा गटनेता कोण? हे गुलदस्त्यात : नावाची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकमध्ये होणार आहे. जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह सर्व 46 नगरसेवक नाशिकला रवाना झाले आहेत.
सर्व नगरसेवक नाशिकला पोहोचल्यानंतर तेथे मंत्री गिरीश महाजन महापालिकेतील गटनेत्याच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण–डोंबिवलीतील 53 नगरसेवक कोकण भवनच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 53 नगरसेवक डोंबिवलीतून बसने मुंबईतील कोकण भवनकडे रवाना झाले आहेत. आज कोकण भवनमध्ये गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेसाठी सर्वांचा एकत्र प्रवास सुरू आहे. तर गटनेतेपद कोणाकडे असणार याबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचा अधिकृत गट स्थापन करण्यासाठी काल बैठक देखील पार पडली होती. आमदार राजेश मोरे यांची नगरसेवकांच्या प्रवासाबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने खुलताबाद तालुक्यात राजकीय समीकरणांनी वेगळं वळण घेतलं आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्या महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत जोरदार लढत देण्याची तयारी चालवली आहे.
खुलताबादमधील ३ जिल्हा परिषद गटांपैकी ‘गदाणा’ हा गट उद्धवसेनेला, तर ‘वेरूळ’ आणि ‘बाजारसावंगी’ हे दोन गट काँग्रेसला सोडण्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रपूरमधल्या दोन्ही नेत्यांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रपूरमधील वाद दिल्लीत मिटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दोन्ही नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अन्यथा दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात येईल, अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांना, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतंय, याच्यापेक्षा दुसरी अपमानास्पद गोष्ट मला दिसत नाही, अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली. महापौरपदासाठी शिंदेंना कुणी धूप घालत नाही, असंही ते म्हणाले.
ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकता, त्यासाठी अशाप्रकारे पंचतारांकित पिकनिक करायची गरज नाही. मुंबईमध्ये 9 लाख रोजगार निर्माण होणार, हे कुठून होणार आहे? गौतम अदानी 5 हजार रोजगार देऊ शकत नाहीयेत. मग हा एवढा मोठा आकडा आला कुठून? जनतेला फसवू नका, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली.
एक हजार कोटींची गुंतवणूक खरंच आली असेल, तर तसं सांगा. आकडे कशाला फुगवून सांगत आहात. गेल्या पाच वर्षांत तुम्ही किती वेळा दावोसला गेलात ते सांगा. प्रत्येक वर्षाला जाता. हे आकडे जर पाहिले, तर जवळपास 75 लाख कोटींच्या वर जातात. ही गुंतवणूक कुठे आहे ते दाखवा. तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय, तेसुद्धा दाखवा, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबईत महायुतीच्या नेत्यांकडून एकीचे दावे केले जात असतानाच धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आमदार तानाजी सावंत आणि आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यातील वादामुळे जिल्ह्यात युतीची गणिते कोलमडण्याची चिन्हे आहेत. काल तानाजी सावंत यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि पक्षनिरीक्षक राजन साळवी यांनी पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याच बैठकीनंतर सावंत गटाने स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची रणनीती आखल्याची माहिती समोर येत असून, यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ७२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते गिरीश महाजन आज नाशिकमध्ये नवनियुक्त नगरसेवकांची एकत्रित बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकीतील वातावरणाचा आढावा घेण्यासोबतच आगामी महापौर निवडीसाठी रणनीती आखली जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने नाशिकचे महापौर पद भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, अनेक दिग्गजांनी या पदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. २२ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यानंतरच महापौर पदाचा खरा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये आहेत. आम्ही सध्या एकनाथ शिंदेंशी चर्चा सुरु आहे. आधी महापौर निवड होईल, त्यानंतर समित्यांचा निर्णय होईल, अशी माहिती अमित साटम यांनी दिली.
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या एका अजब ठरावामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत न करता ती दान समजली जाईल, असा नियम मंदिर प्रशासनाने लागू केला आहे. याचा फटका पिंपरी-चिंचवडमधील भाविक सुरज टिंगरे यांना बसला असून, त्यांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी दानपेटीत पैसे टाकताना चुकून पडली होती. अंगठीचा फोटो आणि योग्य पुरावे दिल्यानंतरही, मंदिर संस्थानने आपला ठराव पुढे करत अंगठी देण्यास लेखी नकार दिला आहे. दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही संस्थान आपल्या निर्णयावर ठाम असल्याने, देवीच्या दरबारात न्याय मिळेल की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता मातोश्री परिसरात बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सुनील जाधव यांनी लावलेल्या एका बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या बॅनरवर बाप तो बाप होता है असे लिहित शिंदे गटाला थेट आव्हान देण्यात आले आहे. चिन्ह चोरले, पक्ष फोडला आणि सरकारी यंत्रणांचा वापर केला तरीही मुंबईत ठाकरे गट आणि मनसेने मिळून ७१ जागा जिंकल्या, तर शिंदे गटाला २९ जागांवर समाधान मानावे लागले, असा टोला या माध्यमातून लगावण्यात आला आहे. “सत्य परेशान हो सकता है, लेकिन मिट नही सकता” असा दावा या बॅनरद्वारे करण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मीरा-भाईंदर निवडणूक निकालानंतर आता ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक २० मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पराभूत उमेदवार दृष्टी घाग यांनी ईव्हीएम मशिनवर जोरदार टीका करत थेट प्रशासनाला आव्हान दिले आहे. घाग यांनी परिसरात बॅनर लावून आपला संताप व्यक्त केला आहे. जर बॅलेट पेपरवर निवडणूक झाली, तरच तुम्हाला तुमची खरी जागा आणि लोकप्रियता समजेल, अशा शब्दात त्यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. या बॅनरबाजीमुळे शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असून निकालावर शंका उपस्थित करणाऱ्यांची चर्चा रंगली आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील विजयाचा निकाल आता हिंसक वळण घेताना दिसत आहे. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमचा उमेदवार निवडणुकीत पडला याच रागातून आरोपींनी तुमची रक्ताची होळी करू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच भंगाळे यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची घटना ताजी असतानाच, आता थेट जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
आगीत घरातील फर्निचर, संसार उपयोगी वस्तू व इतर साहित्य जळून खाक. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास लागली होती आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. घरात कुणीही राहत नसल्यामुळे शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरासमोरील नागरिकांच्या आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले
संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर किरकोळ अपघातानंतर मोटार चालक महिलेने एकाला फरपटत नेले समाज माध्यमातुन या घटनेचे चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी मोटार चालक महिलेला अटक केली या प्रकरणी मोटार चालक महिला मेरसेदे रासुलीफर शीला अटक करण्यात आली असून या घटनेत राम-लक्ष्मण राठोड हे जखमी झाले आहे.
पुणे महापालिकेचा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 43.12 टक्के मते मिळाली असून नोटाला मिळालेली मते महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी तसेच आम आदमी पक्षापेक्षा अधिक असल्याचे निकालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे शिवसेनेने एकही जागा जिंकली नसली तरी त्यांना सात टक्के मते मिळाली असून शहरातील चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे
खेड तालुक्यातून 34 भोर 31 इंदापूर 30 दौंड 23 हवेली 17 बारामती 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात कमी पाच उमेदवारी अर्ज जुन्नर तालुक्यातून दाखल झाले आहेत. पंचायत समिती साठी 305 उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत यात खेड तालुक्यातून ५४ बारामती 49 भोर एकोणचाळीस मुळशी अडतीस शिरूर 21 दोन पुरंदर तालुक्यातील 15 अर्ज दाखल झालेत सर्वात कमी नऊ अर्ज जुन्नर दाखल झाल्या आहेत.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे राहिल्याने ती पूर्ण करून पुढील महिन्यात हा फुल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सेनापती बापट रस्त्यासह परिसरात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी कुठल्याही पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर नाही. आघाडी युतीवर पुण्यात संभ्रम कायम तर काँग्रेस वंचितच्या आघाडीची घोषणा. दोन्ही राष्ट्रवादीची अंतिम यादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवली मात्र सर्व तालुका अध्यक्षांना सूचना शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म देण्यात येणार. भाजप शिवसेना युतीची चर्चा अद्याप अपूर्ण शिवसेनेने भाजपाकडे यादी पाठवली
पुणे ते दिल्ली सहा हजारात होणारा विमान प्रवास साचे तिकीट दर बारा ते पंधरा हजार रुपये. पुण्याहून दिल्ली गोवा जयपुर वाराणसी उदयपूर कडे जाणाऱ्या फ्लाइट्सना मागणी वाढली. पुण्यातून विदर्भ मराठवाड्यात जाणाऱ्या खाजगी बस तिकीट देखील वाढले. शनिवार रविवार सुट्टी आणि प्रजासत्तक दिन सोमवारी आल्याने तिकीट दरात वाढ
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून 22 जानेवारी 2026 रोजी महापाैरपदाची सोडत निघेल. त्यापूर्वी महापाैर पदावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचीही जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई महापालिकेचा महापाैर नक्की भाजप की शिवसेना शिंदे गटाचा होणार यावर संभ्रम कायम आहे. दिल्लीमध्ये यावरून मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची दिल्लीत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. शिंदे सेनेतून राहुल शेवाळे आणि भाजपच्या अमित साटम यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. महापौर, स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्तही घडामोडी वाढताना दिसत आहेत. यासोबतच निवडणुकीसंदर्भातील इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..