Maharashtra News LIVE :वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं – आमदार महेश लांडगे
Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

पश्चिम बंगालमध्ये आज भाजप सरकारचा शपथविधी सोहळा आहे. राजधानी कोलकाता येथे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ असून, शपथविधी सोहळाही पहिल्यांदाच ब्रिगेड परेड ग्राऊंडवर आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सहभागी होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सुनेत्रा पवार याही यावेळी उपस्थित असतील. दरम्यान महाराष्ट्रात, श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये आजपासून 15 मे पर्यंत शनिवारी आणि रविवारी रेफरल दर्शन पास बंद ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थांनी घेतला आहे. उन्हाळी सुट्टी आणि भाविकांची वाढती गर्दी पाहता भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे भाविकांची गैरसोय होऊ नये यामुळे मंदिर संस्थांनी हा निर्णय घेतला आहे . तर मुंबईत मध्य रेल्वेवर उद्या माटुंगा ते मुलुंड या जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.पश्चिम रेल्वेवर बोरिवली-भाईंदर दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. महाराष्ट्र, देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी, अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी निदा खानची SIT कडून चौकशी
टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी निदा खानची SIT कडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात निदा खानची ऑनलाईन साक्ष घेण्यात आली आहे. तीन तासांपासून SITने चौकशी केली आणि नंतर सरकारी पंचा सक्षम ऑनलाईन साक्ष घेण्यात आली आहे.
-
वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं – आमदार महेश लांडगे
हिंदू धर्माचा प्रचार करणारे वारकरी संप्रदायातील महाराज आहेत, त्यांचा आदर ठेवणे सर्वांचे काम आहे. विकास लवांडे यांनी वेगळं वक्तव्य करणं योग्य नाही. राजकारणात आरोप- प्रत्यारोप करावेत.पण वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं आहे.संग्राम भंडारे यांनी चुकीचं केलेलं नाही.लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी शाई फेकून निषेध केला आहे.सांप्रदाय आणि धर्माच्या विरोधात बोलल्यास मस्तक भडकणारच.ज्या 20 लोकांची नाव घेतली ते सर्व आदरणीय आहेत असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.
-
-
तारखा सांगायला जरांगे काय नाशिकचे खरातबाबा आहेत का ? – वकील गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे हे काही नाशिकचे खरातबाबा आहेत का ? आंदोलनासाठी 16 तारीख कशासाठी निवडली? जरांगे हा काही नाशिकचा खरातबाबा आहे का तारखा सांगायला,आंदोलनाच्या तारखेवरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी खोचक टोला लगावला आहे. उद्योगमंत्री येऊन गेले आणि जरांगे यांनी उद्योग सुरू केले आहेत अशीही टीका उदय सामंत आणि जरांगे यांच्या भेटीवरून सदावर्ते यांनी केली आहे. जरांगे यांनी सासुरवाडीच्या नव्हे तर स्वतःच्या ग्रामपंचायतीत सदस्य व्हावं असा टोला सदावर्ते यांनी लगावला आहे.
-
एकनाथ शिंदे यांची पंतप्रधानांनी केली विचारपूस
गुरुवारी खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटले होते. त्यांना इमर्जन्सी लँडिंग करावी लागली होती. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याबाबत विचारपूस केली.प्रवासादरम्यान काळजी घ्या,असा वडीलकीचा सल्लाही शिंदे यांना मोदी यांनी दिला.
-
विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाही फेकीचा निषेध – माजी खासदार विद्या चव्हाण
माजी खासदार विद्याताई चव्हाण यांनी विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाही फेकीचा निषेध व्यक्त केलेला आहे. नितेश राणे यांनी तत्काळ आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. आमदार संग्राम जगताप सापा सारखा रंग बदलत आहे. नितेश राणे हे मंत्री आहेत आणि त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणी कारवाई केली पाहिजे असेही विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.
-
मेट्रोच्या कामाचा निष्काळजीपणा, मेट्रो ब्रीजवरील पत्रा पडल्याने नागरिकांचा जीव थोडक्यात बचावला
पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोच्या कामाचा पुन्हा एकदा निष्काळजीपणा समोर आला आहे. भक्ती शक्ती चौकात मेट्रोचे काम सुरू असताना मेट्रो ब्रिजवरील लोखंडी पत्रा खाली पडला, या घटनेत मोठा अपघात होता-होता टळला आहे. रस्त्याने जात असलेला एक व्यक्ती या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा मेट्रोचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
-
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना सुखद धक्का, अचानक पावसाला सुरुवात
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना सुखद धक्का
मे महिन्याच्या ऐन ऊन्हाळ्यात पावसाला सुरुवात
१ वाजेपासून महाबळेश्वरमध्ये पावसाची रिमझिम सुरू
पावसामुळे हवेत गारवा, पर्यटकांना उष्णतेपासून मिळाला दिलासा
-
निदा खान चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल
निदा खान चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल
SIT प्रमुख संदीप मिटके करणार निदा खानची चौकशी
फरार असलेल्या काळात कोणी कोणी मदत केली याचा सखोल तपास केला जाणार
तसेच मोबाईल चॅट, आर्थिक स्तोत्राचीही माहिती घेतली जाणार
काल नाशिक सत्र न्यायालयाने सुनावली होती ४ दिवसांची पोलीस कोठडी
-
विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाही फेकीचा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निषेध
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निषेध आंदोलन
विकास लवांडे यांवर झालेल्या शाही फेकीचा निषेध करण्यासाठी आंदोलन
संग्राम भंडारे यांना अटक करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन सुरू
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन सुरू
-
बीड : आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक
अनुसूचित जातीच्या आरक्षणात ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण तात्काळ लागू करा या मागणीसाठी बीडमध्ये मातंग समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत राज्यातील मेगा भरती थांबवावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी यावेळी केली. सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
-
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला दुर्दैवी – बाळासाहेब थोरात
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकऱ्यांमध्ये मनुवादी घुसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज हभप संग्राम भंडारे यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. यावर बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला दुर्दैवी आहे. विकास लवांडे निर्धास्तपणे त्या प्रसंगाला सामोरे गेले, त्यांचे अभिनंदन. संतांचे आणि शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचे काम ते करत आहेत. प्रवीण गायकवाड, हनुमंत पवार आणि आता विकास लवांडेंवर हल्ला झाला. प्रतिवाद करून आम्ही कसे खरे वारकरी आहोत हे सांगितले पाहिजे. मात्र हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. दुर्दैवाने सरकार अशा लोकांना पाठीशी घालतंय. वारकरी संप्रदायाने या गोष्टींकडे जागृकपणे पाहिलं पाहिजे.
-
सूर्य तळपळा! ठाण्याचा पारा चाळीशीपार…
राज्यात तापमानाचा पारा वाढला असून मे महिन्यात आग ओकणाऱ्या सूर्यदेवामुळे वैशाख वणवा पेटला आहे. दोन दिवसापूर्वी ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. ठाणे शहरात आज पारा चाळीशी पार पोहचल्याने उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. ठाण्यामध्ये रस्त्यावर रहदारी कमी प्रमाणात दिसून येत आहे तर दुसरीकडे शीत पेय थंड पिण्यासाठी ठाणेकर पाहायला मिळत आहे. आज कमाल तापमान 40.02 अंश सेल्सिअसवर पोहचल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.
-
निदा खान एकटी नाही, मोठं रॅकेट, राज्यात जाळं पसरलं; संजय शिरसाट यांचा दावा
निदा खान एकटी नाही तर हे एक मोठं रॅकेट आहे. निदा खान प्रकरण भयंकर आहे. याचं जाळं संपूर्ण राज्यात आहे. संभाजीनगरसह राज्यात स्लीपर सेल अॅक्टिव्ह आहे. प्रत्येक राज्यात यांचं नेटवर्क आहे. निदा खान सारख्या शेकडो महिला देशभर पसरल्या असाव्यात असा अंदाज आहे. दंगली घडवणे, दमदाटी करणे हा इम्तियाज जलील यांचा हेतू आहे. पोलिसांनी जलील सारख्या लोकांना अटक करावी, अशी मागणी राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. शिरसाट पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
मिसिंग लिंकच्या पुलावरील जीवघेण्या सेल्फीला आळा, महामार्ग पोलिसांनी उचललं नवं पाऊल!
पुणे-मुंबई मिसिंग लिंकवरील जीवघेण्या सेल्फीचा आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नवं पाऊल उचललं आहे. 180 फुटी नयनरम्य पुलावर तात्पुरते बॅरिगेटिंग करण्यात आलंय. त्यामुळं आता इथं वाहनं थांबणं बंद झालंय. 1 मे ला हा मिसिंग लिंक खुला झाला. त्यानंतर 8 मे पर्यंत 204 वाहनांवर कारवाई करत एक लाख साठ हजारांचा दंड ही वसूल करण्यात आला. मात्र तरी ही प्रवाश्यांकडून जीवघेणे प्रकार सुरु होते, हे टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी तात्पुरते बॅरेगेटिंग केलंय.
-
बदलापुरात नेपाळी इसमाचा मारहाणीनंतर मृत्यू, अखेर महिन्याभरानंतर… पोलिसांना मोठं यश
बदलापुरात एका नेपाळी इसमाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी महिनाभर सखोल तपास करत हा अकस्मात मृत्यू नव्हे, तर खून असल्याचं निष्पन्न केलं असून या प्रकरणात एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
बदलापूर पश्चिमेच्या मांजर्ली परिसरात 18 एप्रिल रोजी बादशाह उर्फ शिवप्रसाद रविदास या नेपाळी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गंभीर स्वरूपाच्या अंतर्गत दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. बादशाहाने 17 एप्रिल रोजी बदलापूर पूर्वेच्या गावदेवी परिसरात एक रिक्षा चोरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला काही लोकांनी पकडून मारहाण केली होती. तिथून पुढे गेल्यावर आणखी एका इसमाने त्याला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आणि त्याला बदलापूर पूर्वेच्या मॅक्डोनाल्ड चौकात आणून टाकून दिलं. तिथून बादशाह हा चालत चालत बेलवली भुयारी मार्गातून पुढे मांजर्लीतील आमदार कार्यालयापर्यंत गेला आणि तिथेच कोसळून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती तपासात समोर आली.
त्यानुसार बादशाह याला मारहाण करणाऱ्यांचा शोध घेऊन अनिकेत शेलार या 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. त्याला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून मृत बादशाह याला मारहाण करणाऱ्या अन्य आरोपींचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली आहे.
-
उल्हासनगरात पेट्रोल पंपावर तरुणावर चाकू हल्ला, कौटुंबिक वादातून मेव्हण्याचा भाऊजीवर जीवघेणा हल्ला
उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या पेट्रोल पंपावर तरुणावर चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून मेव्हण्यानेच हा हल्ला केल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून हल्ल्याची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ५ परिसरातील पेट्रोल पंपावर नागेश चव्हाण या तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. नागेश हा संबंधित पेट्रोल पंपावर काम करत होता. ड्युटी संपवून तो घरी जाण्याच्या तयारीत असताना त्याचा मेव्हणा शकील खान हा आपल्या साथीदार अरबाज खानसोबत तेथे आला. कौटुंबिक वादातून झालेल्या बाचाबाचीदरम्यान शकील खान याने सोबत आणलेल्या चाकूने नागेशच्या पोटावर वार केला. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर नागेशला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शकील खान आणि अरबाज खान या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
-
आमच्या गुरुंचा अपमान कसं सहन करणार? संग्राम भंडारे यांचा सवाल
शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संग्राम भंडारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही आमच्या गुरूंवर बोललेल कसं खपवून घेऊ? त्यांनी आमच्या संत परंपरेतील गुरूंचा अपमान केला आहे. आम्ही हे सहन करणार नाही. तो अनेक दिवसांपासून बोलत आहे. आज आम्ही त्याचं तोंड काळं केलं आहे. तो खोटे आरोप करत आहे. त्याची एवढी लायकी नाही की पिस्टल लावावं, असं संग्राम भंडारे यांनी म्हटलं आहे.
-
नैसर्गिक प्रवाहावर शेकडो झाडांची कत्तल करून डिपी रोडचा घाट, कोथरूडच्या तरुणांच अर्धनग्न आंदोलन
पुण्यातील कोथरूड भागातील कर्वे रस्त्यावर असलेल्या नैसर्गिक ओढ्यावर डिपी रोडचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप करत कोथरूड भागातील शिवसेनेचे पदाधिकारी रोहित मारणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन केले.
नैसर्गिक प्रवाह बुजवून व शेकडो झाडांची कत्तल करून डिपी रोडचा घाट या ठिकाणी घालण्यात आला आहे. एकीकडे पुणे शहराच वातावरण दिवसेंदिवस वाढत असताना विकासाच्या नावाखाली ठराविक बांधकाम व्यावसायिकांना फायदा पोहोचवून देण्याच्या उद्दिष्टाने या नैसर्गिक प्रवाहावर सुमारे शेकडो झाडांची कत्तल करून डिपी रोड बांधण्यात येणार आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार आहे असल्याचा आरोप केला आहे.
-
अंबरनाथ नगरपालिकेत नगरसेवक पती-पत्नीची चौथी जोडी दाखल
अंबरनाथ पालिकेच्या सभागृहात सचिन पाटील आणि अश्विनी पाटील यांच्या रूपाने नगरसेवक पती-पत्नीची चौथी जोडी आली आहे. गटाचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागल्यामुळे अश्विनी पाटील या स्वीकृत नगरसेविका बनल्या असून त्यामुळे पती सचिन यांच्यासोबत आता त्यादेखील सभागृहात दिसणार आहेत.
सचिन आणि अश्विनी पाटील ही सभागृहातील चौथी जोडी असून यापूर्वी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले आणि त्यांचे पती नगरसेवक विश्वजित करंजुले, नगरसेवक उमेश पाटील आणि नगरसेविका दर्शना पाटील, नगरसेवक कुणाल भोईर आणि नगरसेविका अपर्णा भोईर या तीन जोड्या सभागृहात होत्या. आता सचिन पाटील आणि अश्विनी पाटील यांच्या रूपाने चौथी जोडी सभागृहात आली असून यानंतर या दोघांनीही आनंद व्यक्त केला आहे. सचिन पाटील यांचे वडील, तसंच अश्विनी पाटील यांचे सासरे सदाशिव पाटील अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आहेत. तर सासू आशा पाटील यादेखील माजी नगरसेविका राहिल्या आहेत. त्यामुळे पती पत्नीच्या जोडीसोबतच एकाच घरातले 3 नगरसेवक सभागृहात असण्याचा योग देखील यानिमित्ताने पुन्हा जुळून आला आहे.
-
चोऱ्या वाढल्या, ग्रामस्थ सतर्क, गावोगावी ग्राम सुरक्षा पथके तैनात
अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी आणि परिसरातील सोनगाव, सात्रळ आणि धानोरे गावांमध्ये चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या चोरीमुळे ग्रामस्थ आता स्वतःच रात्री गस्त घालत असून, गाव सुरक्षा पथके आणि मोबाईल अलर्टच्या मदतीने चोरट्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-
मराठी विषयाचा निकाल 100 टक्के लागला पाहिजे : चंद्रशेखर बावनकुळे
मराठी भाषेचा निकाल शंभर टक्के लागला पाहिजे. मराठी भाषेमध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले पाहिजे आणि त्यासाठी सर्व शिक्षक, पालकांनी महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांचे प्रयत्न केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
-
शिर्डीतील जमीन खरेदी करण्यासाठी सीएने पैसे दिल्याचा अशोक खरातचा दावा… सूत्रांची माहिती
शिर्डीतील बहुचर्चित जमीन खरेदी प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आलाय. फिर्यादी गोंदकर यांची जमीन घेण्यासाठी अशोक खरात याचा पूर्वाश्रमीचा CA ललित पोफळे व त्याच्या भावाने पैसे दिल्याचे शिर्डी पोलिस तपासात समोर आले आहे. ज्या बँक खात्यातून हा सगळा व्यवहार करण्यात आला त्या खात्यात पोफळे बंधूंनी पैसे दिल्याचे शिर्डी पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. काही दिवसापूर्वी पोफळे याने अशोक खरात विरोधात नाशिक पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असली तरी शिर्डी जमीन खरेदीसाठी एवढे पैसे पोफळे बंधूंनी कुठून आणले याचा तपास शिर्डी पोलिस करणार का हे देखील महत्त्वाचे आहे. जवळपास सव्वापाच कोटींचा हा व्यवहार करताना अशोक खरातने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर शिर्डी पोलिसांकडे तपास सुरू आहे.
याच गुन्ह्यात अशोक खरातची पोलिस कोठडी आज संपणार असून त्याला पुन्हा एकदा राहाता दिवाणी न्यायालयात हजर केल जाईल. न्यायालय आज काय निर्णय देते पोलिस कोठडी वाढणार की अशोक खरातचा ताबा पुन्हा नाशिक पोलिसांकडे जाणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे 40 दिवस उलटूनही या गुन्ह्यातील आरोपी कल्पना खरात मात्र अद्यापही फरार असून अहिल्यानगर पोलिसांसह SIT पथक कल्पना खरातला कधी अटक करणार? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
-
परभणीत एटीएम बंद, नागरिकांची पैसे काढण्यासाठी तुफान गर्दी
परभणी मध्ये कॅश उपलब्ध नसल्याने बँकेकडून अनेक एटीएम बंद करण्यात आले आहेत. तुरळक ठिकाणीच एटीएमवर पैसे उपलब्ध असल्याने एटीएम बाहेर नागरिकांची गर्दी झाली आहे. तर काही एटीएमवर 100 रुपयांच्या नोटा मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कॅश मिळत नसल्याने आर्थिक व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे.
-
अनधिकृत कॅफेवर कारवाई करा, आमदार प्रकाश सोळंके यांचं पोलिसांना निवेदन
माजलगाव शहरातील बेकर्स लॉंज नावाच्या कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात विनापरवाना सुरू असलेल्या कॅफेमध्ये गैरप्रकार वाढत असल्याचे नमूद करत, त्यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन 6 प्रमुख कॅफेवर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
-
चाळीसगावात मध्यरात्री दगडफेक… सीसीटीव्ही कॅमेरे पाहून आरोपीचा शोध सुरू
जळगावच्या चाळीसगाव शहरातील मैतर कॉलनी परिसरात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीमध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही दगडफेकीची घटना घडली आहे. दरम्यान, दगडफेक करणाऱ्या जमावाने हवेत गोळीबार केल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून पोलीसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. या घटनेतील काही अज्ञात दगडफेक करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरातील नीदा खान अटक प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची संजय शिरसाट यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच घडलेल्या निदा खान अटक प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणातील आरोपांचा समाजमाध्यमांवर आणि जनसामान्यांमध्ये होत असून, विशेषत: एमआयएम पक्षाशी संबंधित काही व्यक्ती आणि नगरसेवक मतीन पटेल तसेच माजी खासदार इम्तियाज जलील यांची नावे समोर येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे
-
जनगणनेस ओबीसी समाजाचा विरोध
गोंदिया जिल्ह्यात जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी ओबीसी समाजाकडून या जनगणनेला विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा आरोप करत विविध ठिकाणी बहिष्काराचे फलक लावण्यात येत आहेत. सालेकसा तालुक्यानंतर आता आमगाव तालुक्यातही अशा प्रकारचे फलक झळकले असून हळूहळू हा विरोध जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही पसरताना दिसत आहे. ओबीसी समाजाच्या संघटनांकडून जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र सध्याच्या जनगणना प्रक्रियेत तसा उल्लेख नसल्यामुळे समाजामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
-
शाईफेकीचा निषेध-सचिन खरात
विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाई फेकीचा निषेध, विचाराचे उत्तर विचारांनी द्यायला हवं, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व अध्यक्ष सचिन खरात यांनी दिली.
-
शाई फेकणाऱ्यावर कारवाई करा-अंबादास दानवे
विकास लवंडे योग्य भूमिका मांडत आहेत, अनेक जण वारकरी च्या नावाखाली भाजप चे लांगूलचालन करतात. शाई फेकणाऱ्यावर कारवाई करा. सामना करा. वारकरी संप्रदाय शाई फेका असे सांगतो का? शाई फेकल्याने लवंडे यांची भाषा आणि भूमिका यात बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली.
-
निदा खान प्रकरणात एमआयएम अडकली -मंत्री संजय शिरसाट
टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली. याप्रकरणात एमआयएम अडकली आहे. ओवेसी आज दुपारी पत्रकार परिषद घेत आहेत. निदा खान एमआयएमच्या संपर्कात होती. मतीन खान हा लॉकअपमध्ये असताना तो ओवेसीचे स्वागत करण्याचे बॅनर लावतोय. हा प्रकार केरळ फाईल्ससारखाच घडतोय, असा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
-
येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई
येवला तालुक्यातील अंकाई परिसरातील विहिरी, बोरवेलनी तळ गाठला. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती दिसून येत आहे. शासनाच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरवर पाणी भरण्यासाठी महिला, वृद्धसह शालेय विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. ३३ गावे, ३७ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ३३ टँकरच्या माध्यमातून दररोज ५५ फेऱ्या करण्यात येत आहे.
-
हभप संग्राम भंडारी यांच्या कृत्याचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन
हभप संग्राम भंडारी यांच्या कृत्याचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन करण्यात आले. हभप संग्राम भंडारी यांनी विकास लवांडेवर शाईफेक केली. आमदार संग्राम जगताप यांनी केले हभप भंडारी यांचे अभिनंदन केले. या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला बोलायला कोण सांगत हे देखील लोकांसमोर यायला हवं अशी प्रतिक्रिया आमदार जगताप यांनी दिली.
-
विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरण रोहित पवार आक्रमक
विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज दुपारपर्यंत FIR दाखल झाला नाही तर संध्याकाळी मी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार… थोर संतांनी दाखवलेला बंधुभावाचा आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार हाच खरा #महाराष्ट्र_धर्म असून कोणत्याही कट्टरवाद्यांना, गुंडापुंडांना आणि शिव्या देणाऱ्या मनुवाद्यांना हा विचार आम्ही पुसू देणार नाही…! असं रोहित पवार म्हणाले.
-
सुवेंदू अधिकारी बनले भाजपचे पश्चिम बंगालमधील पहिले मुख्यमंत्री
सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कलकत्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड ग्राऊंडवर हा शपथविधी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित आहेत.
-
निकिता कुचेकर या दहावीच्या विद्यार्थिनीला सर्व विषयात 35 मार्क
सोलापुरातील निकिता कुचेकर या दहावीच्या विद्यार्थिनीला सर्व विषयात 35 मार्क. दुर्धर आजारावर मात करत सर्व विषयात 35 मार्क मिळाल्याने चर्चेचा विषय ठरलीय. शहरातील ज. रा. चंडक प्रशालेतील विद्यार्थिनीचे यश. मी आजारी होते. त्यामुळे शाळेला नको म्हणत होते, मात्र शिक्षकांमुळे मी परीक्षेला बसले. आजारी असूनही मी परीक्षा दिली आणि पास झाले. माझ्या मुलीला हृदयाचा आजार आहे. ती वर्षातून दोन ते तीन महिने झोपून असते. मी बांधकाम कामगार आहे. मात्र मुलीने शिकावे अशी माझी इच्छा आहे.
-
अमित शाह यांची चाणक्य निती यशस्वी – एकनाथ शिंदे
“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चाणक्य निती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली असून जनतेने विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेला कौल दिला आहे” असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
-
बुलढाणा पोलिसांचा बुलेटवाल्यांना दणका, कर्णकर्कश सायलेन्सर गाड्या जप्त
बुलढाणा जिल्ह्यात कर्णकर्कश आवाज करून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या बुलेटस्वारांना पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. मॉडिफाय सायलेन्सरचा वापर करून फटाके फोडणाऱ्या २५ बुलेटवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यामुळे जिल्हाभरातील स्टंटबाजांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईदरम्यान आरटीओ निरीक्षकांकडून तांत्रिक तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्याने संबंधितांना मोठा दंडही ठोठावण्यात आला आहे. ‘शान की सवारी’ म्हणून मिरवणाऱ्या या बुलेटस्वारांच्या आवाजामुळे नागरिक हैराण झाले होते, मात्र पोलिसांनी केलेल्या या आक्रमक कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
-
कोट्यवधींच्या पोलीस वसाहतीकडे कर्मचाऱ्यांची पाठ, 208 सदनिका अद्याप रिक्त
अमरावती ग्रामीण पोलिसांच्या निवासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली २०८ सदनिकांची भव्य वसाहत सध्या तरी केवळ पोलीस कुटुंबांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. २०२५ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या वसाहतीचे लोकार्पण करण्यात आले होते, मात्र शहरापासूनचे लांबचे अंतर आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे पोलीस कर्मचारी येथे राहण्यास अनुत्सुक आहेत. सद्यस्थितीत केवळ काही मोजकेच प्रशिक्षणार्थी आणि इतर कर्मचारी येथे वास्तव्यास असून, बाजारपेठ आणि मुलांच्या शिक्षणासाठी शाळांची अनुपलब्धता यामुळे या वसाहतीकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
-
कीर्तनकार भंडारेंकडून विकास लवांडेंवर शाईफेक
कीर्तनकार भंडारेंकडून विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली आहे. हभप संग्राम भंडारे आणि सहकाऱ्यांकडून शाईफेक करण्यात आली आहे. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप लवांडे यांनी केला आहे.
-
चणा व तूर खरेदीला मुदतवाढ; अमरावतीत 10 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा
अमरावती: केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या चणा आणि तूर खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता चणा खरेदी २९ मे पर्यंत, तर तूर खरेदी ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील सुमारे १० हजार नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
लोकसभा निवडणुकीत आम्ही पुन्हा सोबत येणार – संजय राऊत
भाजपने आपली परंपरा कायम राखली. DMK अनेक वर्षांपासून आमचा मित्रपक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही पुन्हा सोबत येणार. NDA ला दूर ठेवण्यासाठी राहुल गांधींचा TVK ला पाठिंबा, असे संजय राऊत यांनी म्हटले.
-
कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; द्वारका परिसरासह नाशिकमधील अतिक्रमणावर बुलडोझर
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. शहरात अतिक्रमणाविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. विशेषतः वाहतुकीची कोंडी होणाऱ्या द्वारका परिसरात आज सकाळी नऊ जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे आणि शेड्स जमीनदोस्त करण्यात आले. कुंभमेळ्यासाठी रस्ते रुंदीकरण आणि भाविकांच्या सोयीसाठी शहराला मोकळा श्वास मिळवून देण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून, द्वारका परिसरासह शहराच्या इतर भागातही ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
-
मुक्ताईनगर व वडोदा जंगलात पाण्याचा खडखडाट; निधीअभावी ८१ कृत्रिम पाणवठे कोरडे
जळगाव : मुक्ताईनगर आणि वडोदा वनक्षेत्रात भीषण उन्हाळ्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे निधीअभावी ८१ कृत्रिम पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. वनविभागाच्या या ढिसाळ नियोजनावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास वन्यप्राणी दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी वनविभाग लोकसहभागातून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करत असला तरी, वेळेवर निधीचा प्रस्ताव सादर न झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप होत आहे. ३२ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असूनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे वन्यजीवांचे हाल होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
-
लग्नाच्या अक्षता टाकून परतणाऱ्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू
बीडच्या गेवराई तालुक्यातुन जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर कोळगावजवळ एका भरधाव टेम्पोने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथील पती-पत्नीचा मृत्यू झाला. लग्नकार्य आटोपून बाबूराव राम बळे आणि पत्नी मंगल बळे दुचाकीवरून घरी परत जात असताना हा अपघात घडला. चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले. टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
पंढरपुरातील प्रसिद्ध ओम रेसिडेन्सी येथील वॉचमनला दांडक्याने बेदम मारहाण
पंढरपुरातील प्रसिद्ध ओम रेसिडेन्सी येथील वॉचमनलादांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. गाडी पार्किंग करण्यावरून बाचाबाची झाली, अज्ञात चार जणांच्या टोळक्याने दांडक्याने वॉचमनला मारहाण केली . मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मारहाणीत वॉचमन प्रशांत राऊळ गंभीर जखमी झालेत.
-
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊस , गारपीट, गावाला फटका
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी गावाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याच्या शेतातील केळीच्या बागेचं प्रचंड नुकसान झालं आहे. निखिल भोपळे या शेतकऱ्याच्या केळीच्या बागेतील दोन हजार पैकी पंधराशे झाडं जमीनदोस्त झाली.
केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तसेच कांदा, गहू, संत्रा बागांनाही मोठा फटका बसला. तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
नाशिक – निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त
नाशिक – TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरणी अटकेत असलेली निदा खान हिला आश्रय देणारे छत्रपती संभाजीनगर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला . एमआयएम चे नगरसेवक मतीन पटेल यांना गुन्ह्यात सहआरोपी केलं आहे. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
-
हिंगोली – सकाळपासून अवकाळी पावसाला सुरूवात
हिंगोलीशहरासह परिसरात सकाळी पासून च अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. मात्र बदलत्या वातावरणाचा फटका लग्न सराईला बसला आहे.
-
नाशिक – मध्यरात्रीपासून CNG च्या दरांमध्ये वाढ
नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून CNG च्या दरांमध्ये वाढ झाली आहे. 1 किलो मागे तब्बल 1.50 रुपयांची वाढ झाली . पूर्वी CNG चे दर 93.65 रुपये प्रति किलो होते, रात्रीपासून CNG दर 95.15 रुपये प्रति किलो झाले आहेत. एक वर्षानंतर CNG दरांमध्ये वाढ झाली असून आता CNG आणि डिझेलचे दर जवळपास झाले सारखेच आहेत.
-
पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी, कोलकात्यात कडक सुरक्षा तैनात
कोलकाता येथे सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ब्रिगेड परेड ग्राऊंडच्या आसपासच्या उंच इमारतींमधून सुरक्षेवर लक्ष ठेवले जाईल. ब्रिगेडबाहेर शहरातील व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल.