
जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढू लागला आहे.तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक थंडावा देणाऱ्या फळांकडे वळताना दिसत आहेत. विशेषतःटरबूजाची मागणी बाजारात वाढू लागली आहे. त्यातच रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर टरबूजाची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकऱ्यांकडून येणाऱ्या टरबूजाच्या गाड्यांमुळे बाजारात सध्या पुरेसा साठा उपलब्ध आहे. परिणामी ग्राहकांना ताजे आणि गोड टरबूज सहज मिळत असल्याने वाढत्या उष्णतेत टरबूज खाण्याला नागरिकांकडून पसंती मिळत असल्याने फळविक्रेत्यांचाही व्यवसाय तेजीत आला आहे.
धाराशिवच्या उमरगा लोहारा भागाला गारपिटीचा तडाखा बसला. विजेच्या कडकडाटसह गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात गहू, ज्वारी, कांदा व कलिंगड, पपई याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना आमदार प्रवीण स्वामी यांनी दिले आहेत. शेती नुकसानीचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडणार असून कोरडवाहू हेक्टरी 25 हजार व बागायतीसाठी 50 हजार मदतीची मागणी शिवसेना ठाकर गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केली आहे.
युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर तुटवड्याच्या अफवा पसरत असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येत आहे. अफवेमुळे नागरिक गॅस एजन्सीसमोर गर्दी करताना दिसत आहेत…. मात्र, सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून सर्व नागरिकांना नियमित पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे….
आखाती देशात सुरू असलेले युद्ध थांबावे आणि विश्वशांती नांदावी यासाठी बीडच्या केज येथील भगवान श्रीकृष्ण आश्रमात 108 कुंड तयार करून महाविष्णू याग करण्यात आला आहे. या महाविष्णू यागासाठी जिल्ह्यातील संत महंतांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यागातून प्रत्येकाच्या जीवनात शांती नांदावी आणि युद्ध थांबून विश्वात देखील शांती नांदावी यासाठी यज्ञ करण्यात आल्याची माहिती श्रीकृष्ण आश्रमातील शास्त्री महाराजांकडून देण्यात आली.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथे महिंद्रा कंपनीच्या शोरूम मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या नवीन इलेक्ट्रिक चार चाकी वाहनाला आग लागल्याने गाडी जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महिंद्रा XUV -400EV या इलेक्ट्रिक चार चाकी वाहनाला लागली आग लागली आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दलाच्या आणि शोरूमच्या कामगाराच्या मदतीने आग विझवण्यात आली.
सोलापूर शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा कायम असल्याने रिक्षाचालक आणि सामान्य नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. गॅस पंपांवर पुरवठा अपुरा असल्याने अनेक पंप बंद ठेवण्याची वेळ आली असून, उपलब्ध असलेल्या गॅसच्या किमतीत २० ते २५ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. युद्धापूर्वी ५० रुपये लिटर असलेला गॅस आता ७५ ते ८० रुपयांवर पोहोचला आहे. कंपन्यांकडून मिळणारा अत्यल्प पुरवठा काही तासांतच संपत असल्याने पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. गॅसचे दर गगनाला भिडले असले तरी प्रवासी वाढीव भाडे देण्यास तयार नसल्याने, रिक्षा चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाही. या दुहेरी संकटामुळे अखेर रिक्षा बंद ठेवण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नसल्याची खंत रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.
नागपूर येथील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निर्माण झालेला गॅसचा गंभीर तुटवडा आता काहीसा कमी झाला आहे. काही प्रमाणात सिलेंडर उपलब्ध झाल्याने दोन ते तीन दिवस पुरेल इतका साठा जमा झाला असून, आज सकाळचा नाश्ता वेळेवर तयार झाला आहे. महाराष्ट्र आणि देशभरातून येणाऱ्या १०० ते १५० पाहुण्यांची जेवण आणि नाश्त्याची सोय यामुळे काहीशी सुखकर झाली असली, तरी अद्याप आवश्यक तेवढा पुरवठा मिळालेला नाही. काल मिळालेल्या सिलेंडरवर सध्याचे काम रेटले जात असून, पूर्ण गरजेनुसार गॅस उपलब्ध नसल्याने प्रशासनाला अजूनही इतर पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे.
नाशिक शहरातील नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत व्हावा आणि वितरणातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष आता २४ तास खुला ठेवण्यात आला आहे. या कक्षात कर्मचारी विविध शिफ्टमध्ये काम करत असून, अनेक कर्मचारी रात्रपाळी करून गॅस वितरणाबाबत येणाऱ्या अडचणी सोडवत आहेत. गॅस पुरवठ्याशी संबंधित तक्रारी आणि मदतीसाठी नियंत्रण कक्षात सतत फोन येत असून, प्रशासन अत्यंत सक्रियतेने या समस्यांचे निराकरण करत आहे.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे..जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल आहे. आज मुलीच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती देखील रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज १७ वा दिवस असून, विधानसभेत आज २९३ च्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा पार पडणार आहे. विशेषतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भातील चर्चा अद्याप प्रलंबित असल्याने, आज या संवेदनशील विषयावर सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावरही आजच चर्चा होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष आजच्या कामकाजाकडे लागले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे एक हृदयद्रावक अपघाताची घटना घडली आहे. आपल्या पुतणीला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे दुचाकीने जात असलेल्या काकाचा भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण भीषण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे आहे. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रॅक्टर चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर गेल्या 3 दिवसापासून आगीचा वणवा. प्रचंड धुराची लोट पसरल्याने वनविभागाचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू. सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांनी सतर्कता दाखवत प्रशासनाचे लक्ष वेधले.. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या परिसरात आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाची धडपड
मनसेचे शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित यांनी यासंदर्भात न्यायालयात दाखल केली आहे याचिका. यापूर्वी नाशिक पालिकेने व राज्य सरकार यांना याचिकाकर्ते यांच्या अंतरिम अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर नाही. त्यामुळे आज मनपा प्रतिज्ञापत्र सादर करणार का? याकडे पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचे लक्ष
गारपिटीमुळे कलिंगडची शेती जमीन दोस्त. लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या शेतकऱ्याची माहिती. काढणीला आलेले कलिंगड गारपिटीच्या तडाख्यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान. गारपिटीमुळे कलिंगडाला तडे, मार लागल्याने आत मध्येही कलिंगड डॅमेज जाग्यावरच सडतील
:हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येत्या 20 तारखेपर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आता रब्बी हंगामातील गहू हरभरा आणि इतर पिकांच्या काढणीला वेग आला असून तशी लगबग पाहायला मिळत आहे.
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यानच काल अनेक भागात मोठी गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज अनेक जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आला. यासोबतच काही भागात उष्णता वाढत आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर होते, यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. इराण अमेरिका युद्धामुळे राज्यासह देशात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाल्याने अनेक हॉटेल बंद आहेत. यासोबतच खानावळी चालकांवरही खानावळ बंद ठेवण्याची वेळ आली. मुंबईतील 40 टक्के हॉटेल आज बंद आहेत. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे रोजगार जाण्याची वेळ आली. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.