शिंदे गटाच्या संपर्कात कोण कोण? संजय शिरसाट यांचं बेधडक विधान, ऑपरेशन टायगरचा मोठा खुलासा
संजय शिरसाट यांनी ठाकरे गटातील खासदार आणि आमदारांच्या शिंदे गटाशी संपर्कात असल्याची चर्चांना दुजोरा दिला आहे. 'ऑपरेशन टायगर'ची वेळ एकनाथ शिंदे ठरवतील, असे बेधडक विधान त्यांनी केले. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिरसाट यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. जेव्हा ऑपरेशन टायगर करायचं तेव्हा करूच. ते एकनाथ शिंदे ठरवतील, असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ऑपरेशन टायगरवर भाष्य केलं आहे. आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर करत नाही. पण ज्यांना यायचे त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. ऑपरेशन टायगर करण्याची आता आमची मानसिकता नाही. मात्र जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे, तेव्हा एकनाथ शिंदे ठरवतील. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. काही महिन्यात हे सर्व एकत्र राहतील असे वाटत नाही, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.
या मुजोरी म्हणावी लागेल
मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यात येत आहे, त्यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं. प्रताप सरनाईक यांनी ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी काही वेळ दिला होता. अनेक राज्यात त्या त्या राज्याची भाषा बोलली जाते. मग मुंबईत मराठी का नाही? एवढे करूनही ऐकत नसतील तर ही मुजोरी म्हणावी लागेल. मग कारवाई होईलच, असं शिरसाट म्हणाले.
राजकीय पोळी…
रोहित पवार आजपासून आंदोलन करत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. रोहित पवार यांच्या आंदोलनाला आमचा विरोध होण्याचं कारण नाही. राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम रोहित पवार करत आहेत. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असं ते म्हणाले.
कारवाई थांबता कामा नये
अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. एफडीएच्या मोहिमेचं अभिनंदन केलं पाहिजे. मोठी कारवाई सुरू आहे. त्याचं स्वागत आहे. जे प्रोटेक्शन पाहिजे ते सरकार देईल. आतापर्यंत जे अधिकारी झोपले होते, अधिकारी काय करीत होते? हा प्रश्न आहे. का आपल्याकडे लॅब नाहीत? तपासणी होत नाही? काही लोकांचे लागेबांधे व्यापाऱ्यासोबत होते. ही कारवाई थांबता कामा नये, असं त्यांनी सांगितलं.
