मोठी बातमी! राज्यात आता ओबीसी आंदोलनही पेटणार? जरांगे पाटलांनी तारीख जाहीर करताच, बड्या नेत्याची थेट मोठी घोषणा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 30 मे पासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत, दरम्यान त्यानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. ते येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीमध्ये आपल्या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. आज या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली होती, या बैठकीमध्ये त्यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा करताच आता राज्यात वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेवर ओबीसी नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मोठा इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आंदोलन करत असतील आणि त्याच विषयाला घेऊन ते आंदोलन करत असतील तर त्याला काही अर्थ नाही. जेव्हा त्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या, त्याचा जीआर काढला तो जीआर यांनी वाचून त्याला सहमती दिली त्यानंतर त्यांनी गुलाल उधळला. मग आता त्याच विषयाला घेऊन आंदोलन करणार हे कशासाठी? असा सवाल यावेळी तायवाडे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जरांगे पाटील नवीन विषय घेऊन आंदोलन करत असतील तर समजू शकतो, परंतु विषय तोच आहे. मराठा समाजासाठी ते आंदोलन करत आहेत, मात्र या परिस्थितीत ओबीसी समाजाला दिलेला शब्द सरकारने पळाला नाही, तर ओबीसी समाजासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी घोषणा यावेळी तायवाडे यांनी केली आहे. ओबीसी आपल्या न्यायहक्कांसाठी आंदोलनाला बाराही महिने तयार असतो, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा ओबीसी आंदोलन देखील पेटण्याची शक्यता आहे.
1994 चा निर्णय राज्य मागास आयोगाने दिला होता, ज्यामध्ये कुणबी असून कुणबी मराठा असा उल्लेख केला त्यांना मागास ठरवून त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी शिफारस केली होती, त्याला कोणीही विरोध केला नव्हता करण ते कुणबीच होते. ज्यांच्या प्रमाणपत्रवर फक्त मराठा लिहिलं आहे, त्यांना ओबीसीमध्ये यायच असेल तर तशी शिफारस मागास वर्ग आयोगाने करायला पाहिजे, यासाठी 7 आयोग नेमले पण तशी शिफारस कोणी केली नाही, त्यामुळे 94 चा दाखल आज देऊ शकत नाही, असंही यावेळी तायवाडे यांनी म्हटलं.
