एका महिलेने मला गंभीर माहिती दिलीये… वेळ आली तर… जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंना गंभीर इशारा

Jarange vs Munde : मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांना गंभीर इशारा दिला आहे. 'माझ्या नादी लागू नको तुझी 22 पेक्षा जास्त प्रकरणे माझ्याकडे आली आहेत; अजून मी त्यात हात घातलेला नाही' असं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

एका महिलेने मला गंभीर माहिती दिलीये... वेळ आली तर... जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंना गंभीर इशारा
Jarange vs Munde
Image Credit source: Google
| Updated on: Feb 17, 2026 | 5:26 PM

मराठा आरक्षणाचे आंदोनलकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना गंभीर इशारा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत हत्येची सुपारी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना, ‘माझ्या नादी लागू नको तुझी 22 पेक्षा जास्त प्रकरणे माझ्याकडे आली आहेत; अजून मी त्यात हात घातलेला नाही’ असा इशारा धनंजय मुंडेंना दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.

एक महिला माझ्याकडे आली होती…

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा देताना म्हटले की, ‘आज सकाळी नागपूरवरून रंजना प्रदीप नागपूरकर नावाची महिला माझ्याकडे आली होती. ही महिला ढसाढसा रडली. तिने सांगितलेलं प्रकरण इतकं भयानक आहे. ही महिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नात्यातील आहे. हे प्रकरण खूप गंभीर आहे. धनंजय मुंडेंनी दिलेल्या टेन्शनमुळेच या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला’ असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.

धनंजय मुंडे य़ांची 22 प्रकरणे माझ्याकडे आली आहेत

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे तुझी 22 पेक्षा जास्त प्रकरणं माझ्याकडे आली आहेत, त्यामुळे आता शहाणा हो, आणि माझ्या नादी लागू नको. तुझी लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली आहेस आणि तू मला बदनाम करण्यासाठी काय कारस्थानं करतोय, हे मला चांगलं माहित आहे. धन्या तू इथून पुढे तरी माझ्या नादाला लागू नको. तुझे खूप प्रकरण माझ्याकडे आले आहेत. मी अद्याप गप्प आहे, पण मी जर मागे लागलो तर तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.’

धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेना मंत्रिपद दिल्यावर राष्ट्रवादी पक्ष संपेल, त्यामुळे भाजप त्यांना जवळ करत नाहीये. रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? खून करण्यासाठी मंत्रिपद द्यायचं आहे का? त्यामुळे मला नाही वाटत हे दोन्ही पक्ष त्यांना मंत्रिपद देईल.