भाजपने एकनाथ शिंदे यांना फोडलं असं…; रामदास आठवले यांच्या विधानाने चर्चाच चर्चा
Ramdas Athwale on CM Eknath Shinde and Loksabha Election 2024 : रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी राज्याच्या राजकारणावर आपलं मत मांडलं आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड अन् शिंदे गटाच्या भूमिकेवर रामदास आठवलेंनी भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारत 2022 ला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यांच्या या बंडावर महाविकास आघाडीकडून घणाघाती टीका झाली. भाजपने शिवसेनेच्या आमदारांना फोडल्याचंही म्हणण्यात आलं. याला रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी उत्तर दिलं आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना फोडलं आहे, असं अजिबात नाही. एकनाथ शिंदे स्वतः भाजपसोबत आले आहेत. शिंदे 40 आमदारांना घेऊन आले. त्यामुळे त्यांचा तो जळपट आहे. तो एवढा मोठ्या प्रमाणात आहे. अशा जळपटांना राजकारणात यश मिळत नाही, असं म्हणत रामदास आठवले म्हणालेत.
संजय राऊतांवर टीकास्त्र
सिस्टिमॅटिक काम करावं लागतं मग आरोप प्रत्यारोप करून मत मिळवता येत नाही. संजय राऊत यांचे जे आरोप आहेत त्यांना मतदान करणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संजय राऊत काही बोलत असतील. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं माझं मत आहे, असंही आठवले म्हणाले.
संजय राऊत हे भविष्य व्यक्ती नाही. संजय राऊत म्हणतात महायुतीचे एक माणूस निवडून येणार नाही. आम्ही म्हणतो आमची माणसं निवडून येतील. लोकशाहीमध्ये मत कुणाला द्यायचे आहे तो अधिकार लोकांना आहे. या ठिकाणी ठोकशाही लोकशाही नाही हुकूमशाही नाही. पण मुद्दाम अशा प्रकारचा प्रचार केला जात आहे. या ठिकाणी लोकशाही धोक्यात आली आहे. याच ठिकाणी हुकूमशाही आहे, असं म्हटलं जात आहे. हुकूमशाही जर असती तर मोदी मत मागण्यासाठी आले असते का? तीन-चार सभा रोज संजय राऊत घेतात. त्यामुळे विरोधक करत असलेल्या आरोपात तथ्य नाही, असं रामदास आठवले म्हणालेत.
उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर आठवले म्हणाले…
उज्ज्वल निकम हे आले होते कायद्यांचा त्यांना चांगला अभ्यास आहे. सरकारी वकील म्हणून त्यानी अनेक केसेस लढल्या आहेत. भंडारा जिल्ह्यामधील दलित हत्याकांडाची केस जी होती. त्यामधील सर्व आरोपींना फाशी दिली गेली. अशा अनेक केसेस मध्ये त्यांची कामगिरी चांगली आहे. ते बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे आहेत. उज्ज्वल निकम हे अत्यंत चांगले वकील आहेत. उज्ज्वल निकम हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली जी सोसायटी आहे. त्या सोसायटीमधील मी चेअरमन आहेत आणि त्याच सोसायटीमध्ये ट्रस्टी म्हणून त्यांना घेतला आहे. आज त्यांना उत्तर मुंबईमधून भारतीय जनता पार्टीच त्यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. उत्तर मुंबईमध्ये मधून ते चांगल्या मताने निवडून येतील, अशी मला अपेक्षा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.